जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कर्मचाऱ्यांना आवाहन..
मुंबई (वृतसेवा) राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आजपासून संप पुकारला आहे. तसेच राज्यभर आंदोलनही केलं आहे. शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा विधीभवनात तापल्याचे पाहायला मिळाले.
‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ या घोषवाक्याखाली शासकीय कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर विविध ठिकाणी आंदोलन केलं. यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत याविषयीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली.तरी देखील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच यामध्ये आरोग्य कर्मचारीही सहभागी झाल्यामुळे रुग्णांनचेही हाल होत आहे.
हे पाहता जुनी पेन्शन योजनेबाबत विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन केले . यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक आहे. यासाठी वेगळी समितीही स्थापन करण्यात आली आहे. यावर समिती अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करेल.
त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांना माझं आवाहन आहे की त्यांनी हा संप मागे घ्यावा. यावर चर्चेतूनच मार्ग निघेल. सरकारची भूमिका ही नकारात्मक नाही. त्यामुळे या विषयावरील मार्ग हा चर्चेमधूनच काढावा लागणार आहे.
यामध्ये कर्मचारी आणि संघटनेच्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. या संपाचा आरोग्य विभागाच्या कामावर परिणाम होऊ नये, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी माझी विनंती आहे की संप मागे घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.



