भाजपातील संयमाचा आदर्श, उन्मेष पाटील यांचा राजकीय प्रवास..
राजकारणात तात्पुरत्या लाभासाठी भूमिका बदलणारे नेते वेळोवेळी दिसतात; पण..
निष्ठा विरुद्ध स्वार्थ..
भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती ही इतर पक्षांपेक्षा वेगळी मानली जाते. येथे कोणाचाही राजकीय प्रवास ठरवून होत नाही. पक्षाला आणि संघटनेला जे अपेक्षित असते त्यानुसार नेत्यांचा प्रवास घडत जातो. अनेकदा संयम राखावा लागतो, कधीकधी पद न मिळण्याची परिस्थितीही येते; मात्र पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपा कधीच विसरत नाही.
याचं ताजं उदाहरण म्हणजे विनोद तावडे यांचा प्रवास. अभाविपच्या विद्यार्थी चळवळीतून सुरुवात करून त्यांनी संघ स्वयंसेवक म्हणून काम केले. पुढे विधान परिषद आमदार, विरोधी पक्षनेते, राज्याचे शिक्षणमंत्री अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली. शिक्षणमंत्री असताना पक्षाने त्यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी दिली नाही, तरी कुठेही नाराजी नाही, टीका नाही. पक्ष आणि संघटनेचा आदेश शिरसावंद्य मानून ते शांतपणे संघटनात्मक काम करत राहिले. याच संयम आणि निष्ठेचा सन्मान म्हणून आज पक्षाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. हेच भाजपाचे वैशिष्ट्य — येथे संयमाचे सोनं होते.
दुसरीकडे काही नेत्यांचा प्रवास याच्या अगदी विरुद्ध दिशेने झालेला दिसतो. उन्मेष पाटील यांचा राजकीय प्रवास त्याचं उदाहरण मानता येईल. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत त्यांना चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आणि ते आमदार झाले. त्यानंतर 2019 मध्ये पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आणि ते खासदारही झाले.
मात्र खासदारकीची उमेदवारी नाकारल्याच्या अवघ्या दोन दिवसांत त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तिथे वर्ष-दिड वर्षही पूर्ण होण्याआधीच त्यांनी पुन्हा भूमिका बदलत सत्ताधारी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला पद आणि सत्तेनुसार राजकीय निष्ठा बदलणारे नेते — या दोन प्रवासातील फरक स्पष्ट दिसतो. भाजपा कार्यकर्त्यांच्या संयम, निष्ठा आणि संघटनशीलतेवर उभी असलेली पक्षसंस्था आहे. म्हणूनच येथे पदापेक्षा पक्ष मोठा मानला जातो.
राजकारणात तात्पुरत्या लाभासाठी भूमिका बदलणारे नेते वेळोवेळी दिसतात; पण दीर्घकाळ टिकणारा सन्मान हा नेहमीच निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच मिळतो, हे विनोद तावडे यांच्या राज्यसभा उमेदवारीने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
विजय पांगारे…




