Eknath Shinde : उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार ; एकनाथ शिंदेंच्या एका विधानाने भाजपमध्ये खळबळ..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी खासदार उन्मेष पाटील यांनी काल दिनांक 06 मार्च रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत उन्मेश पाटील व त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
उन्मेश पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार होतील असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं. सध्या जळगाव जिल्ह्यात स्मिता वाघ व रक्षा खडसे या दोन्ही खासदार भाजपच्या असल्याने शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्याने चर्चांणा उधाण आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून स्थानिक भाजपमध्ये कुजबुज सुरु झाली आहे.
मुंबई येथे उन्मेश पाटील यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. पक्ष प्रवेशावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी खासदार असताना केलेल्या कार्याचे कौतुक केले. भारतातील टॉप १० खासदारांमधील उन्मेश पाटील एक आहेत म्हणून ते परत खासदार झाले पाहीजे असं शिंदे म्हणाले. पाटील यांचे राजकीय भवितव्य मोठे आहे. उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार होतील असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले. पुढच्या काळात त्यांना पुन्हा खासदार म्हणून निवडून देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केलं.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी, आपला खान्देश, आपला उन्मेश असा नारा दिला. फक्त मंत्री गुलाबराव पाटील हेच डायलॉग मारतात असे नाही तर मीही मारतो असे मिश्लिकलपणे म्हणताच त्यांच्या वक्तव्यामुळे एकच हशा पिकला. उन्मेश पाटील हा शेतकऱ्याचा पोरगा असल्याचं शिंदे म्हणाले.
दरम्यान, उन्मेश पाटील हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच आहेत. मात्र लोकसभेला भाजपने त्यांना संधी न देता स्मिता वाघ यांना संधी दिल्याने त्यांनी भाजपला सोडून शिवसेना ठाकरे गटाची वाट धरली होती. आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलेलं वक्तव्य लक्षात घेता जळगाव लोकसभा की रावेर लोकसभा उन्मेश पाटील यांना कोणत्या मतदारसंघातून संधी मिळणार, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.




