पक्षबांधणीसाठी आदित्य ठाकरे मैदानात; निष्ठा यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढणार..
आदित्य ठाकरेंची ही निष्ठा यात्रा महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांत जाणार..
झूम मराठी
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. अशातच आता या आव्हानाला तोंड देण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. शिवसेनेला लागलेली गळती सुरूच आहे. शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते, स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते, अनेक महानगरपालिकांतील नगरसेवक हे शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. हीच गळती थांबवण्यासाठी आता आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

शिवसेनेत होणारी गळती रोखण्यासाठी आदित्य ठाकरे हे उद्यापासूनच निष्ठा यात्रेवर निघत आहेत. आदित्य ठाकरे हे मुंबईतला प्रत्येक मतदारसंघ, प्रत्येक शाखा पिंजून काढणार आहेत. त्यांच्या यात्रेची सुरुवात ही बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून म्हणजेच मुंबईतील भायखळ्यातून होत आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील ठाकरे गटाकडे उरलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरे यांची ही निष्ठा यात्रा फक्त मुंबईपुरती थांबणार नाही, तर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचीही योजना आखली आहे.
आदित्य ठाकरेंची ही निष्ठा यात्रा महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांत जाणार आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात तर आदित्य ठाकरे जास्त ताकद लावून ही निष्ठा यात्रा काढणार आहेत. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. संघटन बांधून ठेवण्याचे काम करणार आहेत. मात्र आगामी महापालिकेच्या निवडणुका पाहता शिंदेंची ताकद वाढतेय, तर ठाकरे गटाची साथ लोक सोडत आहेत. आता आदित्य ठाकरेंची ही यात्रा किती कार्यकर्ते बांधून ठेवणार, हे येणाऱ्या निवडणुका आणि येणारा काळच सांगेल.





