मुलं संस्कारी निघाले नाहीत; हतबल बापाची फेसबुक पोस्ट करत आत्महत्या…
मोठ्या कष्टाने आपल्याल मुलांना शिकवलं, पण ते संस्कारी निघाले नसल्याची खंत व्यक्त करत या व्यक्तींनी आयुष्य संपवलं आहे...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) मनाला चटका लावणारी घटना समोर आली असून, एका 50 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. विशेष म्हणजे ‘मी आत्महत्या करत आहे’ अशी फेसबुकला (Facebook) आधी पोस्ट लिहिली आणि त्यानंतर या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचललं आहे. मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना शिकवलं, पण ते संस्कारी निघाले नसल्याची खंत व्यक्त करत या व्यक्तीने आयुष्य संपवलं. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील दत्तात्रय सोरमारे (वय 50 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.
पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील दत्तात्रय सोरमारे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मोठ्या कष्टाने मुलांचं शिक्षण केलं, पण मुलांची साथ मिळाली नसल्याच्या दुःखातून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत, आत्महत्या करण्याचं कारण लिहलं आहे. तर मला माफ करा मी टोकाचं पाऊल उचलत असल्याचं देखील त्यात म्हटले आहे. दत्तात्रय सोरमारे हे गावातील प्रतिष्ठित नागरिक होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- अशी होती फेसबुक पोस्ट
“प्रिय मित्र आणि नातेवाईक तुम्हाला सांगताना माझा कंठ अतिशय दाटून येत आहे. कारण मी तुम्हाला यानंतर कधीही भेटणार नाही. माझ्याकडे काही मित्रमंडळी यांचे पैसे आहेत, ते पैसे परत करण्याची माझी प्रामाणिक इच्छा होती. आज ना उद्या ते पैसे परत करण्याची माझी इच्छा असताना माझ्यावर असं काही प्रसंग आला आहे की, मला नाविलाजाने आत्महत्या करावी लागत आहे. कारण माझ्यावर असा काही प्रसंग आला की, मी कोणालाही तो सांगू शकत नाही. कारण माझे एक स्वप्न होती की, माझं कुटुंब ग्रॅज्युएट व्हावे. त्यामुळे मी माझ्याकडून मुलांचे उच्च शिक्षणासाठी आटोकाठ प्रयत्न केले. कधी मला अडचण आली तरी मी कोणाकडे तरी हात पाय पसरले आणि त्यांचे शिक्षण केले. पण त्याचे फळ म्हणून मला आज आत्महत्या करावी लागत आहे. कारण मी सगळं काही करु शकलो, पण माझ्या मुलांना मी संस्कार देऊ शकलो नाही. त्यामुळे मी आज फाशी घेत आहे. न्यायालयाकडून शिक्षा मिळेल तेव्हा मिळेल, पण मी असा निर्णय घेतला की याची शिक्षा मला मिळायला पाहिजे. कारण की मी माझ्या मुलांचे शिक्षण करुन फार मोठी चूक केलेली आहे. काही माझी हितचिंतक असतील, माझे नातेवाईक असतील त्यांना माझा हा निर्णय पटणार नाही. पण मित्रहो मला माफ करा हा निर्णय माझाच आहे. आणि तुम्ही मला खरंच माफ करताल असं मला वाटत नाही, तर कृपया मला माफ करावं एवढीच हात जोडून विनंती…..”



