महाराष्ट्र
भिवंडीत लग्नाच्या हॉलला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळून खाक
भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या विषयी अधिक माहिती अशी की, मॅरेज हॉलमध्ये लग्नसमारंभ सुरु होता. या दरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाके लावले होते. फटाक्यांची आतिषबाजी करतांना मंडपाला आग लागली. त्यानंतर हळूहळू ही आग पसरून वाहन पार्किंग ठिकाणी असलेल्या सुमारे २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
दीड दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. स्थानिक पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीत मोकळ्या जागेत अनेक व्यावसायिकांनी अशा प्रकारे मॅरेज हॉल थाटले आहेत. मात्र सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने भविष्यात जीवितहानी होण्याची मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, मनपा प्रशासन त्याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे.




