सहा वर्षांपासून बदलीच नाही, तहसीलदारांना राजाश्रय कुणाचा?, तलाठी संघटनांनंतर आता पुढारीही एकवटले!
नांदेड : तीर्थक्षेत्र माहूरचे तहसीलदार एस वरणगावकर यांची बदली करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय पुढारी एकवटले आहेत. माहूर तालुक्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेऊन माहुरच्या तहसीलदारांची बदली करण्याची मागणी केलीय. विशेष म्हणजे याच शिष्टमंडळाने पालकमंत्री अशोक चव्हाण, या भागाचे खासदार हेमंत पाटील यांची भेट घेऊन हीच मागणी केलीय.
- माहुरच्या तहसीलदारांना राजाश्रय कुणाचा?
गेल्या सहा वर्षांपासून तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर हे माहुरमध्ये ठाण मांडून बसले आहेत. या सहा वर्षाच्या काळात तहसीलदार यांची वर्तुणूक वादग्रस्त असल्याचा आरोप सर्वच पक्षांच्या पुढाऱ्यांनी केलीय. विशेष म्हणजे याच तहसीलदारांच्या बदलीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलय, त्यामुळे माहुरच्या तहसीलदारांना नेमका कुणाचा राजाश्रय आहे याची चर्चा जिल्ह्यात रंगलीय.
- तहसीदरांविरोधात महसूल अधिकारी-कर्मचारी एकवटले!
माहूर तालुक्यातील महसूल विभागाचे सर्व कर्मचारी हे तहसीलदारांच्या मनमानीला वैतागले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे एकाच पदावर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्वच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना तहसीलदार मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
त्यामुळे तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी एकत्र येऊन एक तर आमची बदली करा अन्यथा तहसिलदारांची बदली करा अशी मागणी केलीय. एखाद्या तहसीलदाराच्या विरोधात सगळ्या तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी अश्या प्रकारची तक्रार करण्याची नांदेडमधील तरी ही पहिलीच वेळ आहे.
- तलाठी संघटनेचं म्हणणं काय आहे…?
मागील एक महिन्यापासून काही राजकीय लोकांकडे त्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या, त्यामुळे तहसीलदार एस. वरणगावकर यांनी गैरसमजातून त्याबाबतचा राग मनामध्ये धरुन आम्ही तलाठी आणि मंडल अधिकारी यांना मानसिक त्रास देणं सुरु आहे. त्यांची भाषा खूपच अर्वाच्य झाली असून ते महिला तहसीलदारांनाही त्याच भाषेत बोलत असतात. त्यांचे धमकी देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. त्यामुळे सर्व तलाठी व मंडल अधिकारी दडपणाखाली असून अनुचित प्रकार घडू शकतो. आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असं तलाठी संघटनेचं म्हणणं आहे.





