डिजिटल इंडियाच्या गप्पा हवेतच; ५जी च्या युगातही ‘आसनखेडे’ गावाचे नशीब ‘रेंज’विना अंधारात..!
विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे हाल; नेटवर्कसाठी करावी लागते डोंगरदऱ्यात भटकंती..

पाचोरा (प्रतिनिधी):देश आज स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत असून ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘५जी’च्या क्रांतीच्या गप्पा मारल्या जात आहेत. मात्र, पाचोरा तालुक्यातील आसनखेडे (जि. जळगाव) या गावाचे वास्तव याच्या अगदी उलट आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही या गावात मोबाईलला रेंज नसल्याने ग्रामस्थांना नेटवर्कसाठी आजही घराबाहेर पडून उंच आडोसा किंवा जवळच्या गावातील टॉवरचा आधार घ्यावा लागत आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
- नेटवर्कसाठी जीवघेणी कसरत..
आसनखेडे गावात कोणत्याही खाजगी किंवा सरकारी कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नाही. परिणामी, कोणाशी संपर्क साधायचा असल्यास ग्रामस्थांना घरातून बाहेर पडावे लागते. गावातील उंच भिंती, टेकड्या किंवा घराची छप्परे गाठून फोन लावावा लागतो. अनेकदा तातडीच्या कामासाठी शेजारच्या गावातील टॉवरची रेंज मिळेल या आशेने पायपीट करावी लागते.
- विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान..
शिक्षण ऑनलाइन, रेंज मात्र गायब: सध्याच्या काळात स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरणे, ऑनलाइन क्लास किंवा शैक्षणिक अपडेट्स मिळवण्यासाठी इंटरनेटची नितांत गरज आहे. मात्र, रेंज नसल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी अभ्यास करताना काही माहिती शोधायची असल्यास विद्यार्थ्यांना अंधारात घराबाहेर पडावे लागते.
शेतकरी मदतीपासून वंचित: शेतीमालाचे बाजारभाव पाहणे, सातबारा उतरवणे किंवा शासनाच्या विविध योजनांसाठी ओटीपी (OTP) मिळवणे शेतकऱ्यांसाठी दिव्य ठरत आहे. ‘स्मार्ट’ होण्याचे स्वप्न पाहणारा शेतकरी नेटवर्कअभावी मागे फेकला जात आहे.
- आरोग्यसेवेवरही परिणाम..
गावात एखादी आपत्कालीन वैद्यकीय स्थिती उद्भवल्यास रुग्णवाहिका बोलावण्यासाठी सुद्धा रेंज मिळत नाही. अशा वेळी नेटवर्क शोधण्यात जो वेळ वाया जातो, तो रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
- ग्रामस्थांचा संतप्त सवाल..
आम्ही 5G च्या जमान्यात राहतो की पाषाण युगात?” असा संतप्त सवाल आसनखेडे वासीय विचारत आहेत. लोकप्रतिनिधींनी केवळ निवडणुकांपुरते आश्वासन न देता, गावात तातडीने मोबाईल टॉवर उभा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
शिक्षण ऑनलाइन झाले आहे, पण आमच्या गावात साधं बोलण्यासाठी नेटवर्क नाही. आम्ही जगाच्या स्पर्धेत कसे टिकणार? प्रशासनाने आमची ही समस्या तातडीने सोडवावी.”
एक त्रस्त विद्यार्थी, आसनखेडे
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ‘आसनखेडे’ गावाला डिजिटल प्रवाहात सामील करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



