देश-विदेशमहाराष्ट्र
प्लॅस्टिकच्या ध्वजाचा वापर नको; केंद्र सरकारची महत्त्वाची सुचना
नवी दिल्ली (वृत्त संस्था) : भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. प्लॅस्टिकपासून तयार केलेले तिरंगा ध्वजचा जनतेकडून वापर होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. अविघटनशील प्लॅस्टिकपासून तयार केलेले ध्वज सन्मानाने नष्ट करण्यात अडचणी येत असल्याने केंद्राने ही सूचना दिली आहे.
‘राष्ट्रीय ध्वज हा देशातील जनतेच्या अभिमानाचे, महत्त्वाकांक्षेचे आणि आशेचे प्रतीक असतो. त्यामुळे या ध्वजाचा कायम सन्मानच होणे आवश्यक आहे. तिरंग्याबद्दल जगभरात आदर आहे. असे असतानाही जनतेकडून आणि काही सरकारी संस्था-संघटनांकडूनही अनावधानाने याबाबत निष्काळजीपणा दाखवला जातो,’ असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. अनेक राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्येही प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या ध्वजाचा वापर झाल्याचे आढळून आले आहे. प्लॅस्टिक हा अविघटनशील पदार्थ असल्याने त्यापासून तयार केलेल्या ध्वज सन्मानाने नष्ट करण्यात अडचणी येतात. त्यामुळे केवळ कागदापासून तयार केलेल्या ध्वजाचाच सर्व कार्यक्रमांमध्ये वापर केला जावा, असे गृह मंत्रालयाने राज्यांना दिलेल्या सूचनेत स्पष्ट केले आहे.


