ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे मंत्रिपद धोक्यात? का बसणार झटका वाचा
नितीन राऊत थकीत असणाऱ्या ग्राहकांची वीज तोडण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. यामुळे ऊर्जा विभागावर आणि काँग्रेसवर ग्रामीण भागातील जनता आणि शेतकरी नाराज आहेत
झूम मराठी
महाविकास आघाडीत गेल्या दोन-सव्वादोन वर्षांत काँग्रेसला लाभ होताना दिसत नाही, अशी हायकमांडची भावना आहे. यामुळे काँग्रेसने चार मंत्र्यांना घरी बसविण्याचे ठरवले आहे, असे काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यात तीन कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्याचा समावेश आहे. या मंत्री मध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नाव असल्याची चर्चा आहे.
मविआचे सरकार स्थापन झाल्यापासून ऊर्जा खाते नितीन राऊत यांच्याकडे आहे. या काळात ऊर्जा खात्याबद्दल जनतेत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. राऊत यांच्या खात्याबाबत दोन तक्रारी सातत्याने येत आहेत, एक म्हणजे शेतकरी आणि सामान्य जनतेची केली जाणारी वीजतोडणी आणि दुसरी मुंबई-पुणे यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये खंडित होणारा वीज पुरवठा.
नितीन राऊत थकीत असणाऱ्या ग्राहकांची वीज तोडण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. यामुळे ऊर्जा विभागावर आणि काँग्रेसवर ग्रामीण भागातील जनता आणि शेतकरी नाराज आहेत. विरोधी पक्ष भाजपानेही या वीजतोडणीला विरोध केला आहे. मागील आठवड्यात एका शेतकऱ्याने वीजतोडणीला कंटाळून फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली होती. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिवेशनादरम्यान वीजतोडणी थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र अधिवेशन संपताच वीजतोडणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
शहरी भागातील खंडित होणारा वीज पुरवठा आणि ग्रामीण भागात तोडली जाणारी वीज यामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील जनता काँग्रेसवर नाराज आहे. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अलीकडेच पाच राज्यांतील निवडणूक प्रचारात एका मर्यादेत वीज निःशुल्क देण्याचे वचन दिले आहे. याच विरोधाभासामुळे काँग्रेस हायकमांड राऊत यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. विधिमंडळाचे अधिवेशन आटोपताच मंत्रिमंडळात बदल होण्याचे संकेत आहेत.



