आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी पूर्वी लोकप्रतिनिधीचे इलेक्टिव्ह मेरिट हे त्याच्या भरीव विकास कामांवर ठरत होतं. पण आज ते तुम्ही निवडणुकीमध्ये खर्च किती करू शकतात, यावर ठरतं, असं मत मांडलं आहे
जळगाव आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी पूर्वी लोकप्रतिनिधीचे इलेक्टिव्ह मेरिट हे त्याच्या भरीव विकास कामांवर ठरत होतं. पण आज ते तुम्ही निवडणुकीमध्ये खर्च किती करू शकतात, यावर ठरतं, असं मत मांडलं आहे. सरपंच परिषद मुंबईच्या वतीने जळगावात जिल्हा सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पवार बोलत होते. निवडणूक ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी असावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना पोपटराव पवार म्हणाले की, चुका दाखवण्यापेक्षा समन्वयानं काम करण्याची गरज आहे, आजच्या निवडणुकीत पैसा खर्च करुन विजयी होणार्यांना त्यांनी टोला लगावला आहे. पैसा ही विकासासाठी समस्या नाही, गावाचा विकासासाठी मानसिकता असणे ही मोठी समस्या, इतरांवर टीका टीपण्णी करण्यापेक्षा, त्यांच्या चुका दाखविण्यापेक्षा समन्वयाने काम करा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांनी एकत्र येवून काम केले तरच स्वावलंबी गाव आणि बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असे पोपटराव पवार म्हणाले.
अलीकडच्या काळात कामाला विरोध करुन सत्तेत जाण्याचा मार्ग राहिला आहे. निवडणूक प्रक्रिया ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी असली पाहिजे. आपण निवडून आलेल्या प्रतिनिधीला विधानसभेत जाऊन भाषण करण्याची संधी देत नाही. लोकप्रतिनिधींना शनिवार आणि रविवारी मतदारसंघात यावं लागतं. अंत्यविधी, दशक्रिया विधी, लग्न, वाढदिवस, बारसं, सण आणि उत्सव या व्यक्तिगत कामासाठी लोक प्रतिनिधींना बोलवतो. आपण वैयक्तिक कामासाठी लोक प्रतिनिधींना बोलवतो मात्र सामुदायिक कामासाठी बोलावलं पाहिजे, असं पवार म्हणाले. हे चित्र येणाऱ्या काळात बदलेलं असं आपण आशावादी राहुया, अंस पोपटराव पवार म्हणाले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा