मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याचे इतिहासातील रंजक किस्से..
महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षा बंगल्याला वेगळेच महत्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा बंगला नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मलबार हिल परिसरात असणारा 12000 चौरस फुटाचा प्रशस्त बंगला आहे. मुळात ‘वर्षा’ बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही तेव्हा वर्षा नव्हते.
बंगल्याचे नावं वर्षा कसे पडले??
वसंतराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होण्याआधी कृषिमंत्री होते तेव्हा ते ‘डग बिगन ‘ नावाच्या बंगल्यात राहत होते. 7नोव्हेंबर 1956 या दिवशी ते ‘वर्षा’ बंगल्यावर आताचा वर्षा तेव्हाचा ‘डग बिगन ‘ बंगल्यावर राहायला आले. पाऊस हा नाईक यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता.त्यामुळं आल्या दिवशीच त्यांनी ‘डग बिगन’ चं नामांतर वर्षा असं केलं.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 20 फेब्रुवारी 1975 रोजी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि त्यांचा एकोणवीस वर्षाचा वर्षा बंगल्यावरील प्रदीर्घ रहिवास संपुष्टात आला त्यांच्या हितचिंतकांपैकी कोणीतरी त्यांना सहज म्हणाले साहेब बंगला सोडण्याची घाई का करता? थोडे दिवस थांबा कदाचित तुम्हांला पुन्हा निमंत्रण येईल. बोलणाऱ्याच्या मनातील निर्मळ भावना लक्षात घेऊन नाईक म्हणाले, आता ते होणे नाही. आता कोणी आग्रह केला तरी माझा बेत बदलणार नाही.’आय हॅव प्लेड माय इनिंग फॉर हेअरली लॉन्ग पिरियड. आय वॉज ऑन द ग्राउंड.’ आता पुरे!

वर्षावर न राहिलेलं मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार हे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास नव्हते कारण तेव्हा मुख्यमंत्र्याचे ‘वर्षा’ हे अधिकृत निवासस्थान बनलेले नव्हते.
शरद पवार या बंगल्यावर का राहिले नाहीत?
शरद पवार जेव्हा वयाच्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले त्या आधी ते वसंतराव पाटील यांच्या काळात उद्योगमंत्री होते व तेव्हा ते उदयोगमंत्री होते. उद्योग मंत्र्यांसाठीचा असलेला रामटेक बंगला ‘वर्षा’ नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रशस्त बंगला मानला जातो. शरद पवारांनी मुख्यमंत्री झाल्यावर ” मला रामटेक हाच बंगला लकी आहे असं सांगत याच बंगल्यात राहणं पसंत केलं “
वर्षा बंगल्याचे नामांतर ‘रायगड ‘ आणि त्यातून उद्भवलेला वाद.
मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी ‘वर्षा’ हे नाव या बंगल्याला अनुरूप नसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाचे नाव ‘रायगड’ असावे असे सुचवले व नामांतर देखील केले.परंतु नंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली व नंतर सत्तेत आलेल्या वसंतरावांनी बंगल्याचे नाव पुन्हा ‘ वर्षा ‘ केले.
असा हा ‘वर्षा’ बंगला महाराष्ट्राच्या राजकारणात मैलाचा दगड राहिला आहे. या बंगल्याचा थाट आणि आकर्षण आजही तसेच आहे आणि भविष्यातही राहिलं हे निश्चित.
लेख कसा वाटला ते जरूर कळवा.



