परमबीर सिंग यांचं पत्र खरं की खोटं? ई-मेल आणि सहीवरून गोंधळ
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यांवर असा आरोप केल्यामुळं राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
- टीम -डिजिटल झूम मराठी न्यूज मीडिया
मुंबई : गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या एका लेटरबॉम्बने राज्यात खळबळ उडाली. थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर खडणीचे आरोप झाले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यांवर असा आरोप केल्यामुळं राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण, ज्या पत्रावरून राज्यात एवढी मोठी खळबळ उडाली आहे. त्या पत्रावरच शंका उपस्थित केली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच ही शंका उपस्थित करण्यात आली असून, हा संपूर्ण वादच उकरून काढल्याचा संशयही व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या लेटर बॉम्बनंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून परम बीर सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे सांगितले जात आहे. इतक्या मोठ्या दर्जाचा अधिकारी आणि त्याच्याशी संपर्क होत नसल्यामुळं अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. पत्राची सत्यता पडताळून पाहिली जात आहे.



