रासपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ पुन्हा महादेव जानकारांच्या गळ्यात
अंबाजोगाई(प्रतिनिधी)- माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या पक्षाची पुनर्रचना झाली असुन अध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली आहे. मागच्या सतरा वर्षापासुन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर काम करणारा रासपाला ओळख मिळवुन देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. धनगर समाजाचे नेते म्हणुन त्यांना ओळखलं जातं. स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी महायुतीमध्ये 2014 पासुन त्यांना घेतलं होतं. पाच वर्षे मंत्री म्हणुनही चांगलं काम त्यांनी केलं.
सर्वसामान्य जनतेतला कार्यकर्ता एवढीच आपली ओळख ठेवत मागच्या सतरा वर्षापासुन रासपा पक्षाला राज्यावरून राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक वाढवण्याचं काम महादेव जानकारांनी केलेलं आहे. जानकर हे धनगर समाजाचे नेते असले तरी अठरापगड जातीधर्माच्या गोरगरीब लोकांच्या सोबत त्यांनी जोडलेला जनसंपर्क चांगला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक प्रश्नावर त्यांनी केलेला संघर्ष कमी नाही. भांडवलशाही लोकांच्या पाठीमागे न जाता झोपडी, वस्ती, तांडे अर्थात गरिबांच्या पाठीमागे राहण्याची त्यांची भुमिका आगळीवेगळी असते. धनगर समाजाला आरक्षण मिळवुन देण्यासाठी त्यांनी उभा केलेला लढा आजही समाज विसरलेला नाही. स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासोबत आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जानकारांचे नेतृत्व अधिकच वाढत गेले. कारण महायुतीमध्ये मुंडेंनी सहभागी करून घेतले. त्यांच्या जाण्यानंतर भाजपा नेत्या पंकजाताई यांनीही जानकारांचा मोठ्या भावाप्रमाणे राजकिय पाठराखण केली. विधान परिषद निवड असेल किंवा कॅबीनेट मंत्री या सर्व त्यांच्या राजकिय निर्णयात पंकजाताई सतत पाठीमागे राहिल्या. बारामती लोकसभा निवडणुक त्यांनी लढवलेली होती. प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणारा नेता अशीही त्यांची ओळख आहे. प्रसारमाध्यमापासुन दुर राहत संघटनात्मक बांधणीवर ते सतत लक्ष देत असतात. महाराष्ट्रात मागच्या अनेक दिवसापासुन सुरू असलेले त्यांचे दौरे गाजावाजा न करता पारावरच्या बैठका त्यातुन माणसं जोडण्याचा त्यांचा सुरू असलेला खटाटोप आगळावेगळा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात सर्व विभागात त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी शेतकर्यांच्या शेतावर दिवाळी साजरा करणारा असा चेहरा ज्यांना त्याग आणि केवळ गरिबांचं कल्याण एवढेच दृष्टीक्षेपात दिसतं. कार्यकर्त्यांना न्याय मिळवुन देणं, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणं आणि खंडेरायावर श्रद्धा ठेवुन सर्वसामान्य जनतेची सेवा करणं ही मानवता त्यांच्यात आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढवताना अनेकांना त्यांनी वेगवेगळी पदं मिळवुन दिली. अठरावा वर्धापन दिन साजरा करताना परत संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ त्यांच्यात गळ्यात टाकुन देशात नेतृत्व करण्याची संधी जानकरांना दिलेली आहे. आगामी काळात ग्रामपंचायतीपासुन लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत राजकारणात रासपाची भुमिका निश्चित महत्वाची राहिल अशा प्रकारे दुरदृष्टी करून पक्ष मजबुतीची पेरणी सद्या ते करत आहेत. कोरोनासारख्या संकटात लॉकडाऊन काळात जानकर एका आश्रमात निवासी राहिले. त्यांचा मुळ स्वभाव चंगळवादी नसुन संघर्ष आणि गरिबांच्या भुमिकेतला आहे. पाच वर्षे मंत्री राहिले पण डोक्यात मंत्र्याची हवा कधीच न येता सामान्य कार्यकर्ता ही ओळख त्यांनी पुसु दिली नाही. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रदेश अध्यक्ष पदी एखादा खमक्या पुढारी जर निवडला तर नवल वाटणार नाही.




