आपल खान्देश
जामनेर पंचायत समितीत कोट्यवधींचा घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसचा उपोषण सुरु
जामनेर पंचायत समितीत कोट्यवधींचा घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप, उपोषण सुरु
जामनेर येथील पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध शासकीय योजनांमध्ये अफरातफर करून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे
जळगाव : जामनेर येथील पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध शासकीय योजनांमध्ये अफरातफर करून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार केला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. संबंधित गैरव्यवहाराची चौकशी झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु आहे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून गंभीर आरोप
जामनेर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपची सत्ता आहे. त्याठिकाणी सिंचन विहिरींची निवड बेकायदेशीरपणे करून शासनाचा निधी लाटण्यात आला आहे. याशिवाय जामनेर पंचायत समितीत काही अधिकारी हे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. त्यांना भाजपचे आमदार गिरीश महाजन यांचे पाठबळ असल्याने ते त्यांच्या इशाऱ्यावर कामे करतात, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक पालवे यांनी प्रशासकपदी असताना फत्तेपूर, ग्रुप ग्रामपंचायत गोद्री आणि जळांद्री येथे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार केला आहे. या साऱ्या प्रकारची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संजय गरुड यांनी केली.




