वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचा तोंडात आलेला घास केला उध्वस्त.
उन्हाळी ज्वारी-बाजरी पिकांचे मोठे नुकसान.!
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नगरदेवळा आखतवाडे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावला गेला आहे. जोरदार वाऱ्यामुळे मका, उन्हाळी ज्वारी आणि बाजरीची पिके आडवी झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा, आखतवाडे, नेरी वडगाव, बदरखे, निपाणे शेत शिवारात जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतांतील उभी पिके आडवी झाली असून काही ठिकाणी मका पूर्णपणे जमीनदोस्त झाले आसून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आणि कर्ज काढून पिकांची लागवड केली होती. मात्र काही मिनिटांच्या वादळाने महिन्यांची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. शासनाने त्वरित पाहणी करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांतही वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.



