रेल्वे प्रवासात हृदयविकाराचा झटक्यात जवान बापू कोळीचे दुर्दैवी निधन..!

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक बंदोबस्तासाठी जात असताना पाचोरा तालुक्यातील लोहारी गावचे CISF जवान बापू कोळी (वय अंदाजे ४०-४५) यांचा रेल्वे प्रवासात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे लोहारी गावावर आणि परिसरात शोककळा पसरली असून, देशसेवेसाठी सज्ज असलेल्या जवानाच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्याच्या लोहारी (ता. पाचोरा) येथील रहिवासी बापू उखा कोळी (वय ४४) हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून नाशिक येथे कार्यरत होते. पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा देण्यासाठी नाशिकहून सीआयएसएफची ९० जवानांची तुकडी रेल्वेने रवाना झाली होती. दरम्यान, २७ मार्च रोजी जलपायगुडी परिसरात प्रवासादरम्यान बापू कोळी यांना अचानक चक्कर येऊन हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जलपायगुडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेने सहकारी जवानांमध्ये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही शोक व्यक्त करण्यात आला. कर्तव्य बजावत असतानाच आलेल्या या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बापू कोळी यांना लहानपणापासूनच देशसेवेची प्रबळ आवड होती. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी २ ऑगस्ट २००२ रोजी सीआयएसएफमध्ये प्रवेश केला आणि तब्बल २४ वर्ष देशाची निष्ठेने सेवा बजावली. सध्या ते नाशिक येथील नोटप्रेस येथे कार्यरत होते. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या होत्या.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच लोहारीसह पंचक्रोशीतील वातावरण शोकाकुल झाले असून, गावकऱ्यांनी य वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पार्थिवावर २९ मार्च रोजी मूळगावी शासकीय इतमामात करण्यात आला.



