कोरोनाच्या संसर्गामुळे धास्ती पसरली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हाताला काम उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत खाद्यतेलाच्या दरात मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे कोव्हिड या संकटाबरोबरच महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे.

लॉकडाउन वाढत चालल्याने ग्रामीण भागात वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीने सर्वसामान्यांच्या “फोडणीचा भडका’ उडवला आहे. कोव्हिडच्या संकटामुळे सर्वजण चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाउनमुळे हाताला काम मिळत नाही. दरम्यान, खाद्यतेलाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. सध्या बाजारपेठेत 165 ते 170 रुपये प्रति किलो सोयाबीन तेलाचे दर झाले आहेत.
गेल्या वर्षी सोयाबीन तेलाची किंमत प्रति किलो 80 ते 90 रुपयांपर्यंत होती. मात्र सध्या हा दर 170 रुपयांवर पोचला आहे. तसेच वाढत्या दरात विक्रीसुद्धा सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक इतर खाद्यतेलाच्या तुलनेत सोयाबीन तेलाचे दर कमी असल्याने त्यास पसंती देतात. मात्र आता सोयाबीन तेलाच्या दरात वाढ झाल्याने घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकेकाळी ग्रामीण भागातही सूर्यफूल, करडी, जवसाच्या तेलाचा वापर होत असे. परंतु आता शेतात सूर्यफूल, करडी, जवस ही पिके तुरळक प्रमाणात घेतली जात आहेत. आता सोयाबीन तेल फिल्टर होऊन मिळत आहे.
सध्या हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. महागाईमुळे संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा