हजारो शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये घोटाळा ? चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी
सुरेश सावळे
महाराष्ट्रात टीईटी परीक्षेतील घोटाळ्यासाठी शालेय शिक्षण विभागातील गैरकारभार चव्हाट्यावर आलेला असतानाच आता २०१२ पासून शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्यांतील घोटाळ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
राज्यातील स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत शिक्षण तज्ज्ञांनी या शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी थेट न्यायाधिशांमार्फत चौकशी आयोग स्थापन करण्याची आणि शिक्षक भरतीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. यासाठी आज शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची भेट घेऊन त्यासाठीचे निवेदन देत यावर कार्यवाही करण्याचा आग्रह धरला.
या शिष्टमंडळात शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी वकिल असीम सरोदे,आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत, सिस्कॉम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर, राष्ट्र सेवा दलाचे विलास किरोते, कार्यकर्ते संजय दाभाडे, वैशाली बाफना,सुरेश सावळे,प्रकाश टेके, विद्यानंद नायक, सतीश यादव व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राज्यातील शेकडो अनुदानित शाळांमध्ये २०१२ नंतर शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यासाठी संस्थाचालक, शिक्षणाधिकारी यांच्या संगनमताने शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा झाला असून त्यावर विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात अनेकदा चर्चा झाल्यांनतर त्यासाठीचा अहवाल बनला मात्र त्यावर कोणतीही अंमलबजावणी होऊ शकली नाही. यामुळे हा घोटाळा खूप गंभीर असल्याने याची चौकशी करण्यासाठी आयोगाची गरज असून २०१२ ते २१ या काळातील सर्व नेमणुका तपासण्याची गरज आहे याबाबत सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून समाजासमोर वास्तव मांडावे अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.



