शिक्षण:भारतात शाळा बंद झाल्याने 37% ग्रामीण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित, महानगरांमध्ये शिक्षणासाठी गरजेची साधने नाहीत
कोरोना महामारीमुळे भारतातील शाळा सरासरी ६९ आठवडे बंद होत्या. हे जगातील सर्वोच्च प्रमाण आहे. ३२ कोटी शालेय विद्यार्थी आणि ८५ लाख शिक्षक व पालकांना अद्याप पूर्ण दिलासा मिळालेला नाही. शाळा बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ऑनलाइन शिक्षणाचा अनुभव अनेकांसाठी चांगला नव्हता. प्राथमिक शाळांतील ४०% विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक साधने नसल्याचे गेल्या वर्षी कोलकाता येथे झालेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले. चेन्नई या दुसऱ्या महानगरात पाचपैकी एका विद्यार्थ्याकडे ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधेचा अभाव आहे.
ऑगस्टमध्ये १५ राज्यांमधील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले की, शहरी झोपडपट्ट्यांमधील केवळ २४% विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकले. शाळा बंद असताना अजिबात अभ्यास केला नसल्याचे सुमारे ३७% ग्रामीण विद्यार्थ्यांनी सांगितले. अनेकांनी संगणक आणि स्मार्टफोनचा अभाव हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. वीजपुरवठा खंडित होणे, इंटरनेट व त्यांच्या भाषेत ऑनलाइन शिक्षणसाहित्याचा अभाव हीही कारणे आहेत.
शाळेत थोडा वेळ घालवणाऱ्या मुलांची स्थितीही चांगली नाही. मुंबईतील ठाणे उपनगरातील दोन मुलांचे वडील असलेल्या ३८ वर्षीय अमोर अहीर म्हणतात की, त्यांचे मूल महामारीपूर्वी अंक आणि अक्षरे लिहायचे, पण तेच आता ते लिहू शकत नाही. कर्नाटकातील शैक्षणिक स्थितीवरील (एसर) वार्षिक अहवालानुसार, इयत्ता दुसरीच्या स्तराची माहिती असणारी तिसरीची मुले २०% होती, आता ती १०%पेक्षा कमी आहेत.
मुली दहा वर्षांनी मागे पडल्या
तामिळनाडूच्या जवाधू डोंगराळ भागातील आदिवासी मुलांना शिकवणाऱ्या के. महालक्ष्मी म्हणतात, महामारीच्या दोन वर्षांनी शाळेत विद्यार्थी, विशेषत: मुली दाखल होण्याचे काम दहा वर्षांनी मागे पाडले आहे. त्या म्हणतात, यावर्षी दुसऱ्या लाटेदरम्यान योगायोगाने एका हुशार विद्यार्थिनीची एका हॉस्पिटलच्या प्रसूती वॉर्डमध्ये भेट झाली. तिच्यासारख्या मुली किमान लग्नापूर्वी हायस्कूल पास होत असत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा