महाराष्ट्रराजकीय

अवघं राजकारण ढवळून काढणाऱ्या शरद पवारांच्या राजीनाम्याचे 6 अर्थ…

येणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्याने पक्षात नवा पेच निर्माण झाला आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. गेल्या वर्षीच त्यांची पाच वर्षांसाठी पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली. 24 वर्षांपासून ते या पदावर आहेत. त्यांच्या या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाबाबत चर्चा रंगली आहे. तसेच पक्षातही धुसफूस सुरू झाली आहे. तर अनेक जण हे शरद पवार यांच्याकडे निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहेत.

आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या निमित्ताने शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना बोलावले होते. याचवेळी शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी त्यांना त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितले. फक्त सुप्रिया या एकमेव नेत्या होत्या ज्या काही बोलल्या नाहीत. अशा स्थितीत शरद पवार यांच्या राजीनाम्याचे महत्त्व काय? आणि पक्षाचे सत्तेचे राजकारण काय आहे… या सर्व मुद्द्यांवर आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

  • राजीनामा मागे घेतला नाही तर पुढचा अध्यक्ष कोण होणार?

सध्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळण्याची अपेक्षा आहे. सोनिया गांधी ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये मागच्या दारातून आपल्या पक्षाचे निर्णय आणि कामांवर लक्ष ठेवतात, त्याच पद्धतीने शरद पवारही पक्षाचे काम करू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शरद पवार गेल्या 63 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर पुढचा अध्यक्ष कोण होणार? पक्ष समिती पुढचा निर्णय घेईल, पुढचा अध्यक्ष कोण असेल ते ठरवेल. असे स्वतः शरद पवार यांनी सांगितले आहे.

  • मुलगी सुप्रिया की पुतण्या अजित… कोण होणार राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष?

आता नव्या पिढीकडे जबाबदारी सोपविण्याची गरज असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. अशा स्थितीत दोनच नावं चर्चेत आहेत. एक म्हणजे शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे आणि त्यांचे पुतणे अजित पवार. अलीकडे अजित पवार यांची भाजपशी जवळीक असल्याची चर्चा आहे. ते लवकरच काही आमदारांसह भाजपशी हातमिळवणी करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, सोमवारी त्यांनी एमव्हीएच्या रॅलीत जाऊन भाजपवर हल्लाबोल करत या चर्चांना पूर्णविराम दिला. पण, शक्यता अजून संपलेल्या नाहीत. आगामी काळात राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याचे सातत्याने बोलले जात आहे.

  • ‘मग MVA मध्ये नवा पार्टनर कोण असणार?’

पवारांनी आपला निर्णय मागे घेतला नाही तर सत्ता कोणाकडे असेल आणि शरद पवारांनी पक्षाध्यक्षपद सोडले तर त्याचा परिणाम महाविकास आघाडीवरही होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीतील सर्वात ज्येष्ठ नेते असल्याने उद्धव ठाकरे गटापासून ते काँग्रेसपर्यंत सर्वच जण त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतात. आता पवार जर आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर MVA देखील फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात MVA मध्ये नवा पार्टनर कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • शरद पवारांच्या राजीनाम्याचा नेमका अर्थ काय?

अजित पवार यांच्याबाबत सर्व प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर पक्षाची कमान सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. कुटुंब आणि पक्षात अंतर्गत कलह असल्याचीही चर्चा आहे. पक्ष आणि कुटुंबातील अंतर्गत कलह थांबवण्याच्या उद्देशाने शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्याचे मानले जात आहे.

अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्यावरून त्यांची मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचं पाहायला मिळालं आहे. मला 100 टक्के मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे ते म्हणाले होते. यासाठी 2024 ची वाट का पाहायची? अजित पवार यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अजित पवार राष्ट्रवादीत फूट पडून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा असतानाच त्यांच्याविषयीचं वक्तव्य समोर आलं होतं. दुसरीकडे शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. असं असताना अजित पवार यांची बंडखोरी ही संघटनेत फूट निर्माण करू शकते. अशा स्थितीत 2024 साठी नव्या युतीचा मार्ग खुला करण्यासाठी शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

 खरे तर शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. राजीनाम्याची घोषणा करून त्यांनी पक्ष आणि कुटुंबातील अंतर्गत वादाबाबतही मोठा संदेश दिला आहे. विरोध करणाऱ्यांना पवारांनी आपली काय ताकद आहे हे देखील दाखवून दिल्याचं या निमित्ताने बोललं जात आहे. पवार यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर सर्वच नेत्यांनी त्यांना त्यांच्या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले.

  • शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित काय म्हणालेले?

शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवार म्हणालेले की, ‘आम्ही कुटुंबीय आणि पक्षाचे नेते एकत्र बसू. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. पक्षाच्या बैठकीत तुमच्या भावना लक्षात घेऊनच शरद पवार हे निर्णय घेतील, याची मी तुम्हाला खात्री देतो. अजित पवार म्हणाले, नव्या पिढीने नेतृत्व करावे, अशी पवार साहेबांची इच्छा आहे. अशा स्थितीत नव्या नेतृत्वाला संधी मिळायला हवी. ते निर्णय मागे घेणार नाहीत. मात्र, आम्हाला शरद पवारांची साथ मिळत राहील. त्यांच्या संमतीनेच पक्ष निर्णय घेत राहील.’ असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांनी हे जे मतप्रदर्शन केलं होतं त्याचबाबत अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं होतं. कारण सर्वच जण शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्यास सांगत असताना अजित पवार हे सांगत होते की, शरद पवार आपला निर्णय काही मागे घेणार नाहीत.

  • दोन राजकीय भूकंप?

याआधी 19 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी येत्या 15 दिवसांत दोन राजकीय ‘भूकंप’ होणार असल्याचे सांगितले होते. सुप्रिया सुळे यांचा संकेत या दिशेने नक्कीच होता. त्यामुळा आता दुसरा राजकीय स्फोट काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे