महाराष्ट्र

महापौर नरेश म्हस्के यांचे आवाहन नागरिकांनी शासनाच्या निर्बंधांचे पालन करुन कोरोना साखळी तोडण्यास सहकार्य करावे

महापौर नरेश म्हस्के यांचे नागरिकांना आवाहन

ठाणे, ता. 05 : मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सध्या होत असलेले कोरोनाचे संक्रमण हे अधिक असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अतिशय दक्ष राहून आपली स्वत:ची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे, शासन व महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे व निर्बंधाचे पालन नागरिकांनी कटाक्षाने पाळावे असे जाहीर आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.

मागील वर्षापेक्षा यावर्षी आपण या आजाराचा प्रतिकार करण्यासाठी सर्व शक्तीनिशी तयार असलो तरी कोरोनाबाधित व मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. शासनाच्या व महापालिकेच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील सुरू आहे. परंतु मागील काही दिवस नागरिकही कोणत्याही गोष्टीचे पालन करत नसल्याने कोरोनाचा या आजाराचा फैलाव वाढत आहे. महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात असल्या तरी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपलब्ध असलेली रुग्णालये अपुरी पडत आहेत. खाजगी रुग्णालये जी कोविडकरिता वापरण्यात येत आहे, त्या ठिकाणी देखील नवीन रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तसेच सद्यस्थ‍ितीत विलगीकरण कक्षाची सुविधा देखील अपुरी पडत आहे. संपूर्ण देशभर रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे औषधपुरवठ्यावर देखील याचा परिणाम होत आहे.

आजही अनेक नागरिक हे विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत असल्याचे दिसून येते, काही नागरिक हे विनामास्क वावरत आहेत, सोशल डिस्टन्सींगचे देखील पालन होताना दिसत नाही. या सर्व बाबी कोरोनाला पोषक असून नागरिकांच्या जीवास धोकादायक ठरणारे आहे. कोविड 19 प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर ठाणे महापालिकेने विक्रमी लसीकरण मोहिम राबविली आहे व ती आजही सुरू आहे. शासन व महापालिका ही सर्व कामे आपल्या सुरक्षिततेसाठी करीत आहे, परंतु आपले सहकार्य मिळत नाही याची खंत असल्याचे महापौरांनी नमूद केले आहे.

सद्यस्थ‍ितीत लहान मुलांमध्ये देखील कोरोनाचा फैलाव झाल्याचे दिसून येत आहे ही अत्यंत भयावह बाब आहे. तरी नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क हा नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल या पध्दतीने लावावा, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. आपला परिसर स्वच्छ राहील यादृष्टीने काळजी घेणे, विनाकारण प्रवास टाळावे. आपले सहकार्य कोरोनावर प्रतिबंध मिळवण्यासाठी कामी येणार आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या नियमांचे व निर्बंधाचे पालन करावे व या आजाराची संसर्ग साखळी तोडण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन पुन्हा पुन्हा महापौरांनी केले आहे.

गेल्या आठवड्याभरापासून ठाण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 1500 च्या वर असून रविवार 4 एप्रिल 2021 रोजी हा आकडा 1701 इतका होता, तर 5 एप्रिल 2021 रोजी जवळपास 1650 इतका आकडा आहे. कोरोनाची ही रुग्णसंख्या मागील वर्षांच्या तुलनेत दुपटीने वाढली असून ही परिस्थ‍िती चिंताजनक आहे. ही परिस्थ‍िती सुधारण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. महापालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासन कारवाई करेल आणि त्यानंतरच आम्ही पालन करु असा पवित्रा नागरिकांनी घेवू नये. माझे कुटुंब माझी जबाबदारी या भावनेने नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून नियमांचे पालन केल्यास आपण ठाणेकर नक्कीच ही चेन ब्रेक करु असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे