राजकारण आणि नेत्यांमुळे मैत्रीमध्ये फूट पडू देऊ नका!
सोशियल मीडियावर स्वघोषित कार्यकर्ते आणि समर्थकांचा धुमाकूळ : तरुण पिढीत आपसात पडतेय फूट!
झूम मराठी संपादकीय
सध्या महाराष्ट्रातलं सुरु असलेलं राजकीय नाट्य पाहता लोकांच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. कोणत्याही नेत्याबद्दल आणि राजकारणाबद्दल अगदी सहज प्रतिक्रिया गल्लीबोळातली पोरं देतात. प्रत्येक जण उघडपणे किंवा लपून छपून एखाद्या नेत्याला किंवा विचारधारेला पाठिंबा देत असतो. सहज राजकारणाची चर्चा होते एकमेकांच्या आवडत्या नेत्यांबद्दल चुकीच्या प्रतिक्रिया तोंडून निघतात आणि मग वाद विवाद वाढत भांडणं होतात. कित्येकदा शाब्दिक भांडणांमधून पुढे गंभीर हाणामारी होते आणि नाती समाजकारणाचं नाव पुढे करून आणि जनतेची सहानुभूती मिळवून नेतेमंडळी त्यांचं राजकीय दुकान चालवत असतात. पक्षासाठी काम करणारे कित्येक हाडाचे कार्यकर्ते ह्यात होरपळले जातात आणि त्यांचं घरदार सोडून दिवसरात्र नेत्यांच्या मागे फिरताना दिसतात. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणारे संघटक आणि मेहनती हात ह्यांच्यावर निवडणूका आल्या कि हमखास अन्याय होताना दिसतो कारण त्यांना अपेक्षित असणारं निवडणुकीचं तिकीट किंवा पद मिळत नाही. नेतेमंडळी कार्यकर्त्यांच्या जीवावर घराणेशाहीचं रोपटं मोठं करतात. पण तरीसुद्धा सामान्य कार्यकर्ते जरासुद्धा लाज न बाळगता निव्वळ एकनिष्ठता म्हणत आंधळा पाठिंबा देतात.
नेतेमंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक पावलं उचलत असतात. एखाद्या पक्षात मनासारखा फायदा झाला नाही तर सहजतेने ते कोणालाही विचारात न घेता मनमजीने पक्ष बदलतात. म्हणूनच स्वाथी राजकारण्यांच्या मागे जाऊन आपलं आयुष्य बरबाद करण्यापेक्षा सध्याच्या राजकीय घटनांना नाट्य म्हणून पहावं.
सर्व मित्रांना कळकळीची विनंती आहे कि राजकारणावर आधारित कोणतीही चुकीची प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. अलीकडंच राजकारण पाहता कोणीही नेते कट्टर राहिले नाहीत. नेते मंडळींनी करोडो रुपयांची संपत्ती जमवून स्वतःच साम्राज्य उभं केलं आहे त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी ते कोणतंही पाऊल उचलताना दिसतील. आपल्या कोणीही मित्राने राजकारणाची काही पोस्ट किंवा मेसेज केला असता त्याचा फक्त आनंद घ्या आणि हसत हसत दुर्लक्ष करा. निव्वळ पक्षाची एकनिष्ठता आणि नेत्यांसाठी आपल्या जवळच्या व्यक्तींचा राग रुसवा मनात धरू नका. अनेक नेते येतील आणि जातील. गाव आपला समाज आपले मित्र नातेवाईक तसंच नाती गोती आणि विशेष म्हणजे आपली मैत्री घट्ट राहिली पाहिजे.
योग्य त्या व्यक्तीला निवडणुकीत मतदान करा आणि हक्काने नेत्यांकडून आपली कामं करवून घ्या. नेते मंडळी हे लोकांचे सेवक आहेत तेव्हा तुम्ही त्यांचे सेवक बनून त्यांचे पाय धरू नका.
सोशियल मीडियावर प्रतिक्रिया देताना पोस्ट शेयर करताना कोणाला दुखवू नका आणि समाजभान दाखवून वादविवाद टाळावा.



