एकाच कुटुंबातील ४ जणांना जेवणामधून विषबाधा, तीन बालकांचा मृत्यू ; आईची मृत्यूशी झुंज!
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बागझरीतून, धारासुरे कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
बीड (प्रतिनिधी) बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील बागझरीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेवणातून एकाच कुटुंबातील चौघा जणांना विषबाधा झाली असून या घटनेत आधी दोन बालकांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पाठोपाठ आठ महिन्यांच्या चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आईची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईवर आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून तिचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मात्र विषबाधेचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथे तीन बालकांचा विषबाधेने मृत्यू झाला आहे. काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या दोन मुलींपाठोपाठ आठ महिन्याचा मुलगा नारायण याचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे विषबाधा प्रकरणातील मृत्यूंची संख्या आता तीनवर गेली आहे. या तिन्ही बालकांची आई भाग्यश्री यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्रीच्या जेवणानंतर त्यांची पत्नी भाग्यश्री, मुली साधना आणि श्रावणी आणि मुलगा नारायण याला विषबाधा झाली असावी. असा अंदाज वर्तविला जात आहे. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर चौघांना स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. साधना (वय 6), श्रावणी (वय 4), नारायण (8 महिने) अशी मृत बालकांची नावे आहेत. तर, पत्नी भाग्यश्री (वय 28) यांची देखील प्रकृती चिंताजनक आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथे ही घटना घडली आहे. धारासुरे कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेवर आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. चौघा जणांना विषबाधा कशामुळे झाली, याचं कारण अद्याप समजलेलं नाही.



