भंडारा : राज्य सरकारने काढलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाज संतापला असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना भंडाऱ्यातील ओबीसी मतदार मात्र नाराज आहेत. त्यामुळे ओबीसी नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. ‘कृपया मत मागायला येऊ नये, आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे’, अशा पाट्या ओबीसींनी आपल्या घराबाहेर लावल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं ओबीसी समाज संतापला गेला असून येत्या 21 डिसेंबरला होणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमच्या घरी मत मागायला येऊ नका, असं भंडाऱ्यातील मतदारांचं म्हणण आहे. या निषेधार्थ चक्क नागरिकांनी आपल्या घरावर निषेध पाट्याही लावल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव आहेत. बहुसंख्य असलेल्या ह्या समाजाने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने आता आपले काय अशी भीती उमेद्वारांमध्ये निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 13 व पंचायत समितीच्या 25 तर नगर पंचायतींच्या 13 ओबीसी जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून आरक्षण नाही तर मतदान नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या निर्णयाला जिल्ह्यातील ओबीसी समाजानंही पाठिंबा दिला आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा