थंडीच्या गारठयात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा माहोल तयार..

राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचारासाठी आता अवघे १०-१२ दिवस शिल्लक आहेत. तर, दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्य निवडणूक आयोगात हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी जवळपास अंतिम टप्प्प्यात आल्याचं बोललं जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ६ आणि ७ जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम उपलब्ध असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र, सध्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये गुंतलेले मनुष्यबळ मोकळे झाल्यानंतरच जिल्हा परिषदांसाठी मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे मतदानाच्या अंतिम तारखांवर आयोगाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
यंदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासंबंधीचा माहोल पाचोरा भडगावच्या ग्रामीण भागात तयार झाला आहे. इच्छुक मंडळी आपापल्या क्षेत्रात मतदार नोंदणी, जनजागृती, लहान कार्यक्रम घेऊन संपर्क अभियान राबवित आहेत. अनेक इच्छुक उमेदवारीसाठी आपापल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावत आहेत.
पाचोरा व भडगाव तालुक्यात आपापल्या गटात अभियान राबवून कार्यकर्ते तयार करीत आहेत. संबंधित भागातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत आहेत. यामुळे थंडीत निवडणुकीचा माहोल तयार होताना दिसत आहे, सर्वच पक्षातील इच्छुक उमदेवार सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले आहेत, व्हाट्सअप ग्रुपवर व गावातील पारावर जि प निवडणुकीची चर्चा सुरू झाली असून, जो संपर्कात होता, जो सुखदुखःखात आला, त्यालाच संधी द्यायची, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच लागणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे आचारसंहिता आहे. सध्या महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू आहे
जळगाव जिल्हा परिषदेत सुमारे तीन वर्षे प्रशासकराज आहे. विविध कारणांनी निवडणूक प्रक्रिया लांबली. सदस्य, पदाधिकारी जिल्हा परिषदेत नसल्याने सरपंच, ग्रामीण भागातील कार्यकर्ते, पुढाऱ्यांना अडचणी आल्या. आपापली कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे खेटे घालावे लागले होते. निवडणूक प्रशासनानेच अंदाजपत्रक, कामे, मंजुऱ्या, निधी याचे काम करून घेतले आहेत. नवीन वर्षात कधीही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लागू शकतात असा अंदाज मानला जात आहे.



