आपल खान्देश

पाचोऱ्यात तो खुणावतोय मी पुन्हा येईन.. नागरीकच देताय आमंत्रण

पाचोरा : कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा किती भयावह आहे हे सर्वश्रुत आहे. आता कुठे दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असली तरी भीती अद्याप कायम आहे.कोरोनाचे बाधितांचे वाढणारे प्रमाण विदारक असले तरी नागरीकांची बेफिकरी कायम राहिली. लॉकडाउन सुरू असताना देखील रस्‍त्‍यावर ट्राफिक जाम झालेली पाहण्यास मिळत आहे.

पाचोरा शहर व परिसरात कोरोना बाधीतांसह मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस भीतीदायक आहे. असे चित्र असल्याने महसूल, पोलीस, पालिका, आरोग्य विभागासह आमदार किशोर पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कंबर कसून साखळी तोडण्यासाठीचे नियोजन केले. तरी शहरातील बाजारपेठेत होणारी गर्दी पाहून वा रे लॉकडाऊन असा सूर व्यक्त होऊन पाचोरा वासियांच्या बेफिकीरवृत्तीला दंडवत घालावासा वाटतो अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

आज सोमवार  सकाळपासूनच शहराचे प्रमुख रस्ते व बाजारपेठेत झालेली गर्दी धडकी भरवणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भडगाव रोड गिरड चौफुली पर्यंतचा रस्ता वाहनांच्या गर्दीमुळे सुमारे एक तास अक्षरश: थांबला. वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने वाहनांच्या कर्कश आवाजामुळे कमालीचे ध्वनिप्रदूषण झाले. अखेर पोलिसांनी या रस्त्याचा ताबा घेतला व अर्ध्या तासानंतर वाहतुकीची कोंडी नष्ट करून वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.

पाचोरा शहरात सध्या कोणीही यावे आणि कुठेही दुकान मांडावे; अशी जणू काही स्पर्धाच लागलेली आहे. शहराचा एकही रस्ता असा नाही, तिथे उघड्यावर विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणारे विक्रेते नाहीत. शहराचा हार्ट मानला जाणारा भडगाव रोड तर जणूकाही चौपाटी बनला आहे. भर रस्त्यावर दुकाने थाटली जात आहेत. त्यासंदर्भात पालिका कोणत्याही प्रकारे कठोर कारवाई करत नाही. विशेष म्हणजे पालिकेने शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी भडगाव रोड भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हर ब्लॉक बसविले. परंतु विविध वस्तू विक्रेत्यांनी या ठिकाणी दुकाने थाटून जणूकाही आम्ही ह्या जागेचे मालक आहोत अशा अविर्भावात व्यवसाय थाटले आहेत. अनेक घर मालकांनी आपल्या घरासमोरील जागा व्यावसायिकांना भाड्याने दिल्या आहेत. जागा पालिकेची, जनतेच्या पैशातून विकास कामे आणि त्या जागेचे भाडे मात्र काही घरमालक घेत आहेत.असा तुघलकी कारभार राजरोसपणे सुरू असल्याने समाज मनातून संतप्त भावनांना उधाण आले आहे.

प्रचंड गर्दीत अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, सोशल डिस्टंसिंगचा तर प्रश्नच येत नाही. अशी अवस्था असल्याने याला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण प्रशासन की नागरिक? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहर व परिसरातील कोरोना संसर्गाची गती लक्षात घेता आमदार किशोर पाटील यांनी गेल्या दोन दिवसापूर्वीच व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात ता १५ ते २२ मे दरम्यान कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. असे असताना नागरिकांना मात्र कोरोना संसर्गाची कोणत्याही प्रकारची भीती राहिली नसल्याचे चित्र शहरात होणाऱ्या गर्दीवरून स्पष्ट होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे