रेशन धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त ..!
छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांच्या छाप्यात सरकारी धान्याचा काळा बाजारात जाणारा एक प्रकार उघड झालेला आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे हे धान्य आहे. महाराष्ट्र सोबतच पंजाब सरकारचेही यात धान्य असल्याची माहिती पुढे आली आहे. हे धान्य सरकारी पोत्यांमध्ये काढून खाजगी कंपनीचे लेबल असलेल्या पोत्यात भरल्या जात होतं. वाळूज भागात जिथे गोडाऊनवरा छापा टाकला तिथं अशी शेकडो पोती आढळून आलेली आहेत. या गोडाऊनला साळीचा परवाना आहे, म्हणजे साळीमधून धान्य निर्माण करायचे आणि ते पुरवायचं. मात्र इथे थेट तांदूळ आणि गहू येत होतं आणि फक्त सरकारचं लेबल काढून खाजगी कंपनीचे लेबल असलेल्या पोत्यात ते भरण्यात येत होतं.
माहितीनुसार, यात पोलिसांनी वाळूज भागातील एका ऍग्रो कंपनीच्या गोडाऊनवर छापा टाकला असून या छाप्यात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा धान्य साठा पोलिसांना आढळून आला आहे. सरकारी पोत्यांमधूनकाढून हे धान्य खाजगी कंपनीच्या पोत्यात टाकण्यात येत होतं आणि बाजारात विक्रीसाठी जाणार होतं, असेही तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी जवळपास 20 लोकांना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या कारवाईमुळे मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता अधिक बळावली असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, हे धान्य रेशन दुकानात जाणारे असून हे धान्य शाळांना पुरवल्या जाणारे आहे. मात्र सरकारच्या गोडाऊनमधून हे धान्य थेट खाजगी गोडाऊनमध्ये आले होतं आणि येथून त्याची पॅकिंग बदलून हे धान्य पुढे विक्रीसाठी जात होतं. दरम्यान हा एक मोठा घोटाळा संभाजीनगरच्या पोलिसांनी उघड करत हे प्रकरण उजेडात आणले आहे. या प्रकरणी जवळपास 20 लोकांना ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र सरकारच्या गोडाऊनमधून हे धान्य थेट खाजगी गोडाऊनमध्ये नेमकं आलं कसं? यात काही सरकारी कर्मचाऱ्यांचे ही हात आहे का? असे अनेक सवाल या निमित्याने आता विचारले जाऊ लागले आहे.



