आपल खान्देशआरोग्य व शिक्षण
लसीकरणात महाराष्ट्राची अव्वल कामगिरी! सर्वाधिक नागरिकांना मिळाले लसीचे दोन्ही डोस!
गेल्या काही दिवसांपासून करोना लसीचे अपुरे डोस हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातल्या वादाचा मुद्दा ठरला आहे. त्यातच १ मेपासून केंद्र सरकारने लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची देखील घोषणा केली. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील मोठ्या संख्येने नागरिक लसीकरणासाठी पात्र ठरले. त्यामुळे राज्यात लसींचे डोस अपुरे पडू लागले आहेत. मात्र, तरीदेखील राज्यानं लसीकरणामध्ये अव्वल कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक नागरिकांना लसीकरण केल्याची बाब महाराष्ट्राच्या खात्यात जमा होती. आता लसीचे दोन्ही डोस मिळालेले सर्वाधिक नागरिक महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे या बाबतीतही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आत्तापर्यंत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. कोणत्याही राज्याने लसीचे दोन्ही डोस दिलेल्या नागरिकांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, राज्यात १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांना देखील लसीकरण सुरू करण्यात आले असून आत्तापर्यंत या वयोगटातल्या १ लाख ५३ हजार ९६७ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे.



