मी शिवसेनेशी गद्दारी करून बाहेर पडलो नाही ; राज ठाकरेंचे विधान..
मनसेप्रमुख राज ठाकरे हे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज ठाकरे यांनी आज मंगळवारी रवींद्र नाट्यमंदिर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरी शैलीत भाषण केले. राज्यातील राजकीय घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकला. बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर कसे पडले, याबाबतही त्यांनी माहिती दिली.
बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा मी पक्षातून बाहेर पडणार असल्याचं कळलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांचे त्या वेळचे शब्द काय होते, याविषयी राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच त्यांनी भाष्य केले. मी शिवसेनेशी गद्दारी करून बाहेर पडलो नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांच्या बंडांशी माझी तुलना करू नका. हे सर्व जण एका पक्षात आणि सत्तेत गेले. मी बाळासाहेबांना भेटून आणि सांगून बाहेर पडलेलो आहे. बाळासाहेबांशी भेटीदरम्यान मनोहर जोशी माझ्यासोबत होते. जोशी बाहेर गेल्यावर बाळासाहेबांनी मला बोलावलं. असे हात पसरले मीठी मारली आणि म्हणाले जा.. त्यादरम्यान बाळासाहेबांना समजलं होतं. त्यामुळे मी दगाफटका करून, पाठित खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही. बाहेर पडून कोणत्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला, असे राज ठाकरे म्हणाले.
राज्यात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर बोलतांना राज ठाकरे म्हणाले, गेल्या दोन तीन महिन्यापासून जे राज्यात सुरु आहे ते महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. अशा प्रकारचे राजकरण महाराष्ट्रात कधीच झाले नाही. जो मतदार आहे ना त्याने 2019 ला मतदान केलं. त्याला कळतही नसेल आपण मतदान कुणाला केलं. कोण कुणात मिसळला आणि कोण कुणातून बाहेर आला काहीच कळत नाही.सध्याचे राजकरण म्हणजे तात्पुरती आर्थिक अडजेस्टमेंट सत्तेची अडजेस्टमेंट आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.



