कापूस बियाणे सर्रास जादा दराने विक्री; या आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार..
कठोर कारवाई करण्याची मागणी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कृषी विभागावर नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी कृषी विभागाच्या बेपर्वाईमुळे ८५० रुपयांना मिळणारी कापूस बियाणाची बॅग १२०० ते १३०० रुपयाला मिळत आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
आमदार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की धुळे जिल्ह्यात कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. यात अनेक शेतकरी मेमध्येच कापूस लागवड करतात. यंदा अनेक कंपनीचे बियाणे निश्चित केलेल्या दराऐवजी जादा दराने मिळत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांकडून रोज प्राप्त होत आहेत. यात कंपनी, वितरक व दुकानदार यांचा काळाबाजार सुरू असून तब्बल सात कंपन्यांच्या बियाणांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याच्याही तक्रारी आहेत.
या वर्षी आचारसंहिता असल्याने खरीप हंगाम आढावा बैठकीस लोकप्रतिनिधींना उपस्थित राहता आले नाही. मात्र, आचारसंहिता असली तरी शेती व शेतकरी यांना प्रथम प्राधान्य देऊन नियोजन करणे महत्त्वाचे होते. कृषी विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसून ठरवून हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी म्हटले आहे. कापूस बियाणेच नव्हते तर १६ मेपासून विक्री का सुरू केली व शेतकऱ्यांना वेठीस का धरले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- कठोर कारवाई करा
८६४ रुपयांचे बियाणे पाकीट १२०० ते १३०० रुपयांना विक्री होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे याप्रश्नी तत्काळ बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्यवेळी व निश्चित दरात बियाणे मिळेल, यासाठी उपाययोजना करावी, अधिक दराने विक्री करणारे वितरक व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.



