जळगाव लोकसभा निवडणुकीत फक्त राजकारण मात्र विकासाची मुद्देच नाही ?
जळगाव लोकसभा भाजप-महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी सोपी असलेल्या या निवडणुकीत रंग भरला आहे. उन्मेश पाटलांनी मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाणांवर केलेल्या टीकेमुळे स्मिता वाघांपेक्षाही महाजन-चव्हाणांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.या मतदारसंघात सातत्याने भाजपचे प्राबल्य राहिले आहे. पूर्वाश्रमीच्या एरंडोल व आताच्या जळगाव लोकसभा क्षेत्रात माजी केंद्रीय मंत्री एम.के. पाटील यांच्यानंतर २००७ मधील पोटनिवडणूक वगळता भाजपचेच खासदार सातत्याने निवडून आले आहेत. २००९, २०१४ व २०१९ मध्ये भाजपने मोठ्या फरकाने हा मतदारसंघ जिंकला.
२०१९ मध्ये भाजपअंतर्गत काही घडामोडी घडल्या आणि तत्कालीन खासदार ए.टी. पाटलांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यावेळी जिल्हाध्यक्ष असलेले उदय वाघ यांनी मोठ्या शिताफीने पत्नी स्मिता वाघ यांच्यासाठी उमेदवारी जाहीर करुन आणली. मात्र, काही दिवसांतच त्यांची उमेदवार रद्द होऊन ऐनवेळी उन्मेश पाटलांना रिंगणात उतरवले गेले.
चार लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने ते विजयीही झाले. मात्र, आता २०२४ मध्ये भाजपने पुन्हा एकदा या मतदारसंघात उमेदवार बदलला. उन्मेश पाटलांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, २०१९ ला उमेदवारी नाकारल्यानंतरही ए.टी. पाटील, स्मिता वाघ यांनी पक्ष सोडला नव्हता.
उन्मेश पाटलांनी मात्र त्यास फाटा देत ही स्वाभिमानाची लढाई असल्याचे सांगत ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करुन भाजपला थेट आव्हान दिले. विशेष म्हणजे, आपण उमेदवारीसाठी पक्ष सोडला नाही असा संदेश देत त्यांनी त्यांचे मित्र व पारोळ्याची माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासाठी शिफारस केली व ठाकरे गटाची उमेदवारी मिळवून दिली.
त्यामुळे या मतदारसंघात प्रथमच भाजप विरूध्द शिवसेना (उद्धव ठाकरे) असा सामना रंगणार असून त्यात उन्मेश पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याठिकाणी सुरवातीला ‘वंचित’कडून उमेदवारी जाहीर झालेल्या प्रफुल्ल लोढा यांनी निवडणुकीतून अर्ज दाखल करण्याआधीच माघार घेतली. आता भाजपच्या निष्ठावंत व अभाविपच्या कार्यकर्त्या असलेल्या स्मिता वाघ व भाजपतून शिवसेनेत प्रवेश केलेले नवखे करण पवार यांच्यातच खरी लढत होणार आहे.
स्मिता वाघ यांच्यामागे पक्षाचे संघटन, अभाविपचे केडर आणि विशेष म्हणजे संघाचे पाठबळ आहे. तर करण पवारांची भिस्त व्यक्तिगत मित्रपरिवार, नातेसंबंध आणि संपर्कावर आहे. स्मिता वाघ याआधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व नंतर विधान परिषद सदस्या म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत, तर करण पवारांची राजकीय ओळख पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष या पलीकडे नाही. या गोष्टींचा दोन्ही पक्षांकडून कसा वापर केला जातो, यावरही मतदारसंघातील परिणामाचे भवितव्य अवलंबून आहे.
पाडळसरे प्रकल्प, कापसाला भाव, बलून बंधारे कळीचे मुद्दे..
जळगाव मतदारसंघ हा जिल्ह्याचा पश्चिम भाग आहे. बहुतांश क्षेत्र गिरणा पट्ट्यात येते, त्यामुळे पाण्याचे इथे दुर्भिक्ष्य असते. काही तालुक्यांमध्ये दरवर्षी टंचाई असते. तीस वर्षांपासून रखडलेला पाडळसरे (निम्न तापी) प्रकल्प, गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्प, कापसाला भाव नाही हे या क्षेत्रात कळीचे मुद्दे ठरतील.
सातत्याने भाजपचा खासदार निवडून येत असला तरी या प्रकल्पांची कामे मार्गी लागलेली नाहीत. मात्र, बळीराजा संजीवनी योजनेतून पूर्ण झालेला वरखेड- लोंढे प्रकल्प, महामार्गाचे चौपदरीकरण व रस्त्यांची कामे ह्या जमेच्या बाजू ठरू शकता. अशाच मुद्यांभोवती निवडणूक फिरणारआहे.



