..तर मंत्री गिरीश महाजनांना मत मागण्याचा अधिकार नाही..
कॅबिनेट मंत्री असून जर तुम्ही काहीही करत नसाल तर मंत्री गिरीश महाजन यांना मत मागण्याचा अधिकार नाही, अशी टीका उन्मेष पाटलांनी गिरीश महाजनांवर केली आहे.
लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करत भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे उन्मेष पाटील हे नाराज होते. त्यांनी भाजपची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावरून भाजपचे गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटलांवर जोरदार टीका केली होती. आता उमेश पाटील यांनीदेखील गिरीश महाजनांवर निशाणा साधला आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विमाबाबत ते बोलत नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव देण्याबाबत बोलत नाही. शेतकऱ्यांबाबत जर यांची इतकी गेंड्याची कातडी असेल तर यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे, अशी टीका उन्मेष पाटील यांनी गिरीश महाजनांवर केली आहे.
पुढे म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्याला अनुदान नाही. लिंबू उत्पादक शेतकऱ्याला अनुदान नाही. कापसाला अनुदान नाही. त्यामुळे कॅबिनेट मंत्री असून जर तुम्ही काहीही करत नसाल तर मंत्री गिरीश महाजन यांना मत मागण्याचा अधिकार नाही. संवेदनशिलता यांच्यामध्ये असायला हवी. मात्र ती दिसत नाही फक्त सत्ता आणि पैसा असच दिसत आहे. म्हणून मी म्हणतो यांना जनाची नाही तर मनाची लाज असायला हवी.



