मल्हारराव होळकरांनी तेव्हाच ज्ञानवापी मशीद पाडली असती, पण काशीच्या पुरोहितांनी…
झूम मराठी
उत्तरप्रदेशमधील वाराणसीत सध्या धार्मिक तणाव वाढलाय. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग, हिंदू देवीदेवतांचे अवशेष सापडल्याचा दावा केला गेलाय. दरम्यान मुस्लीम बांधवांकडून यासाठी विरोध केला जात आहे. तसं बघितलं तर ज्ञानवापी मशीद वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिराला लागूनच आहे. मुस्लीम आक्रमकांनी हिंदुंची मंदिरं पाडून मशिदी उभ्या केल्याचा दावा केला जातोय. पण आपल्याला माहितीये का २८० वर्षापूर्वी जर वाराणसीतल्या पुरोहितांनी अडवलं नसतं तर ज्ञानवापी मशिदीचा वाद आज उभा राहिला नसता. स्वराज्यातील माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकरांनी ज्ञानवापी मशीद पाडण्यासाठी तयारी केली होती पण पुरोहितांनी विरोध केला आणि ज्ञानवापी आजही उभी आहे. त्या मल्हारराव होळकरांचा आज स्मृतीदिन.
आजपासून तब्बल २८० वर्षापूर्वीची गोष्ट. इसवी सन १७४२. स्वराज्याची सूत्रे त्यावेळी पेशव्यांच्या हातात होती. मराठा सरदार मल्हारराव होळकर त्यावेळी माळव्याचे सुभेदार होते. आजच्या मध्यप्रदेशमधील काही भाग त्यावेळी माळव्यात होता. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्याच्या सीमा मराठा सैन्यांनी पाकिस्तानातील अटकेपर्यंत नेल्या होत्या. मुघलांनी आक्रमण केलेल्या हिंदू मंदिराचा कायापालट करण्याचा मराठ्यांनी प्रयत्न केला. काशीतील शिवमंदिराला उध्वस्त करून मुघल आक्रमकांनी मशिद उभारल्याचा दावा त्यावेळीही केला जात होता. मल्हारराव होळकरांनी मग ही मशीद पाडण्याचा प्लॅन आणि पुण्याच्या पेशव्यांची परवानगी घेत आपल्यासोबत २० हजारांचं सैन्य घेऊन त्यांनी काशीकडे कूच केली.
मुघलांनी आक्रमण करून हिंदूच्या शिवमंदिरावर बांधलेली ही मशिद असल्याचा दावा त्यावेळी केला जात होता. ती मशिद जमीनदोस्त करण्यासाठी मल्हारराव गेले होते. पण घडलं वेगळंच. सगळी तयारी करून गेलेल्या मल्हाररावांना काशीतील पुरोहितांनी विरोध केला आणि मशिदीवर आक्रमण करण्यापासून रोखलं. मशीद पाडून मल्हाररावांचं सैन्य परत गेल्यावर मुघलांचे सैन्य आम्हाला त्रास देईल असं तेव्हा पुरोहितांना वाटलं होतं. पण त्यावेळी मुघल साम्राज्य कमकुवत झालं होतं हे त्यांच्या लक्षात आलं नाही. खरं तर औरंगजेबाचा मृत्यू १७०७ मध्ये झाल्यावर मुघलांचं साम्राज्य हळूहळू लयाला जायला सुरवात झाली होती.
सत्तेसाठी मुघलांच्या वशंजामध्ये सत्तेसाठी वाद सुरू होते. त्याचाच फायदा घेत मराठ्यांनी अटकेपर्यंत झेप घेतली होती. पण मल्हाररावांना झालेल्या त्यावेळच्या पुरोहितांच्या विरोधामुळे त्यांना सैन्य घेऊन परत यावं लागलं होतं नाहीतर आजच्या ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर शिवमंदीर उभं असतं.
श्रीमंत मल्हारराव होळकरांची सून अहिल्याबाई होळकरांनी पुढे काशी विश्वेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला. काशी विश्वनाथ मंदिराच्या आवारात त्यांचा पुतळा आजही आपल्याला पाहायला मिळतो. त्याआधी ११ व्या शतकात राजा हरिश्चंद्रानी काशी विश्वेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केले.
इसवी सन ११९४ मध्ये मोहम्मद घुरी याने या मंदिराची लूट केली होती. त्यानंतर १४४७ मध्ये सुल्तान मोहम्मद याने तेथे मशीद बांधली असा दावा केला जातो पण यावर इतिहासकारांचे मतभेद आहेत. त्यानंतर १५८५ मध्ये पंडित नारायण भट्ट यांनी हे मंदिर बनवलं. पुन्हा १६३२ मध्ये शहाजहाने हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी मुघल सैन्याला स्थानिकांकडून विरोध करण्यात आला होता. १६६९ मध्ये औरंगजेबाने अखेर या मंदिराला तोडून तेथील ज्ञानव्यापी परिसरात मशिद बांधली असं सांगितलं जातं. यावर उपलब्ध असलेल्या तात्कालीन पुराव्यावरुन सध्या मतभेद आहेत.

इंदौर संस्थानाचे संस्थापक आणि स्वराज्यातील कर्तबगार सेनानी मल्हारराव होळकर यांना त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.



