उद्धव ठाकरेंची घोषणा, उद्या रात्री 8.00 पासून 15 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर
कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊनची घोषणा केली. राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन असेल.
उद्या 14 एप्रिल रात्री 8.00 वाजेपासून ते पुढील 15 दिवसांपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक वाहतूक बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
अचानक लॉकडाऊन लागू केल्यास, गोंधळ निर्माण होऊ शकतो हे जाणून सरकारने यासंदर्भात घोषणा करण्यापूर्वी पुरेसा वेळ घेतला. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली. त्यानंतरच लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात आला.
संचारबंदी
14 तारखेपासून उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू होईल. पंढरपूर इथे निवडणुकीनंतर निर्बंध लागू होतील. सकाळी 7 ते रात्री 8 अति आवश्यक सेवा सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक बंद होणार नाही. ट्रेन, बस सुरू होणार. जीवनावश्यक सोयीसुविधा देणारा कर्मचारी वृंदांची येजा नीट व्हावी यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहील.
आस्थापने बंद राहतील
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सार्वजनिक आस्थापने बंद राहणार. हॉटेल आणि रेस्टॉरंटना पूर्वीचेच निर्बंध लागू असतील. पार्सल किचन सुरू राहतील.
काय सुरू असेल?
हॉस्पिटलं, डायग्नोस्टिक सेंटर्स, क्लिनिक्स, व्हॅक्सिनेशन, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मसी, फार्मसिटकल कंपन्या, हेल्थ सर्व्हिस, उत्पादन यंत्रणा आणि त्याची वाहतूक करणाऱ्या यंत्रणा.
दवाखाने, विमा, औषधं, औषधी सेवा डिलर, लस उत्पादन कारखाने, लस वाहतूक वाहनं, वैद्यकीय कच्चा माल वाहतूक. जनावरांशी संबंधित- कृषीची जनावरं, पाळीव प्राणी, वेअरहाऊसिंग, पावसाळ्याची कामं करण्यासाठीचा कर्मचारी, रिझर्व्ह बँक, सेबी, ईकॉमर्स, अधिस्वीकृती धारक पत्रकार, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, सुरक्षामंडळं सुरू राहतील.
किराणा, दूध, भाजीपाला दुकानं सुरू राहतील. कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस खुली असतील. विविध देशांचे दूतावास कार्यालयं सुरू राहतील.




