महानगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्यमंत्रिमंडळामध्ये एकमताने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी मुंबई वगळता बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार आहे.
राज्यमंत्रिमंडळाची आज बैठक होती. या बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकांबाबतच्या प्रभाग रचनेबाबत चर्चा करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातली आहे. मात्र निवडणूक होण्यापूर्वीच सत्ताधारी शिवसेना व भाजप यांच्यातील वादविवाद वाढू लागले होते. राज्य सरकारने आता महानगरपालिका मुंबई वगळता निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आणल्यामुळे विरोधकांनीही राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
महापालिका निवडणुकांसाठी बहुसदसयीय प्रभाग पध्दतीचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. मात्र, प्रभागात किती सदस्य असतील हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. दरम्यान, मुंबईत एक तर पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूरसह इतर साऱ्या महापालिकांसाठी तीन सदस्यांचा प्रभाग असेल, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका मुदतीत म्हणजे, फेब्रुवारीत होणार असल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे प्रभागरचनेचे कच्चे आराखडे तयार करण्याच्या प्रक्रियेलाही वेग येणार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा