टिळकांनी नव्हे राजे तुकोजी होळकरांनी छत्रपतीच्या समाधीचा जीर्णोद्धार केलाय..
झूम मराठी वृत्तसेवा
लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी पैसे जमा केले, पण जीर्णोद्धार केला नाही. इंदौरचे राजे तुकोजी होळकर आणि ब्रिटिशांनी १९१७ मध्ये समाधीचा जीर्णोद्धार केला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे खोटं बोलून स्वतःची पाठ थोपवून घेत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेतली आणि बऱ्याच मुद्द्यांना हात घातला होता. त्यामध्ये त्यांनी टिळकांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महारांजांची समाधी बांधली असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधण्यासाठी निधी गोळा केला पण समाधी बांधलीच नाही असे आरोप होऊ लागलेत. त्यावर टिळकांच्या वंशजांनी स्पष्टीकरण देत टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधली असा आमचा दावा नाही असं सांगितलंय.
राज ठाकरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबतचे विधान चुकीचे आहॆ. भोंगा बंद आंदोलन मुळे सध्या महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. लोकशाहीत ज्या प्रकारचे राजकारण झाले पाहिजे ते होत नाही. राज ठाकरे प्रचंड खोटा इतिहास सांगून महाराष्ट्रात वातावरण बिघडवत आहेत. लोकमान्य टिळकांनी ना समाधीचा जीर्णोद्धार केला, ना ती शोधून काढली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शोधली. त्यांनी त्यांच्यावर पोवाडा लिहिला आणि शिवजयंती सुरू केली.
छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले स्मारक केले. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने १९१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला. लोकमान्य टिळक आणि पुण्यातील काही लोकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी काही पैसे जमा केले होते. परंतु १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि तो पैसा तसाच शिल्लक राहिला, असा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहॆ


