गुलाबराव पाटील ईडी कारवाईला घाबरून शिवसेना सोडून गेले आहेत, ते तिकडे गेले नसते तर जेलमध्ये गेले असते – संजय सावंत
जळगाव : नशिराबाद येथे आयोजित सभेत बोलताना शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी गुलाबराव पाटील यांना चांगलाच टोला लगावला. सावंत म्हणाले, “जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ईडी कारवाईला घाबरून शिवसेना सोडून गेले आहेत, ते तिकडे गेले नसते तर जेलमध्ये गेले असते.” असा टोला यावेळी सावंत यांनी लगावला. हे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत, हे जे गेलेत त्या दिवशी त्यांना दिल्लीला बोलावले होते. घाबरत, घाबरत दिल्लीला गेले. तेथून परत मुंबईत आले, फोन केला. साहेब, मला अडचण आहे, मी थांबू शकत नाही. मला नोटीस दाखवली आहे. त्यामुळे मला थांबता येणार नाही, मग घाबरून ते पळाले आहेत.” असे सावंत यांनी सांगितले.
“हे हिंदुत्व, शिंदे वगैरे काही नाही, ते त्यांचे सर्व थोतांड आहे. यांनी बेसुमार संपत्ती कमावली आहे. त्याच्या चौकशीच्या भीतीने हे तिकडे गेले आहेत. तिकडे गेले नसते तर जेलमध्ये गेले असते. आम्हाला संजय राऊत यांचा अभिमान आहे. त्यांच्यावर ईडीने खोट्या केसेस केल्या, हा योद्धा गेली दोन महिने झाले जेलमध्ये आहे; परंतु ते म्हणतात मोडेन पण वाकणार नाही, हा खरा बाळासाहेबांचा खंदा शिवसैनिक आहे. राऊत म्हणतात, मला किती महिने जेलमध्ये ठेवता ते बघू द्या; मात्र बाहेर आल्यावर या ४० जणांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही.” असेदेखील संजय सावंत म्हणाले.




