पतीवर पत्नीने विश्वास ठेवून पुन्हा संसार थाटला, त्याच पतीने तिचा घात केला

एक खळबळजनक बातमी समोर आली आहे, एखाद्या क्राईम सिनेमालाही लाजवेल असा हा भयानक कट ज्या पतीवर पत्नीने विश्वास ठेवून पुन्हा संसार थाटला, त्याच पतीने तिचा घात केला.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये एका रस्ते अपघाताचा बनाव रचून पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून हा गुन्हेगार सुटू शकला नाही.
“२ मार्च २०२६… जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे इथं वृषाली प्रकाश गावंडे या आपल्या स्कुटीने कामावर जात होत्या. अचानक एका अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात वृषाली यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा निव्वळ अपघात वाटत होता, मात्र…
अपघात झाला, अंत्यसंस्कार झाले. पण वृषाली यांच्या भावाच्या मनात शंकेची पाल चुकत होती. भावाने पोलिसांकडे धाव घेतली आणि हा अपघात नसून ‘घातपात’ असल्याचा संशय व्यक्त केला. इथूनच सुरू झाला बुलढाणा पोलिसांचा ‘ऑपरेशन इन्व्हेस्टिगेशन’.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक पुरावे गोळा केले. संशयाची सुई थेट पती प्रकाश गावंडे यांच्याकडे वळली. जेव्हा मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा गुन्ह्याचं धागेदोरे उलगडत गेले.
एखाद्या क्राईम सिनेमालाही लाजवेल असा हा भयानक कट होता. पती प्रकाश गावंडे याने आपला मित्र मंगेश चौहुलकर याला सोबत घेतले. अवघ्या एक लाख रुपयांत पत्नीचा काटा काढण्यासाठी मनीष सूर्यवंशी या ड्रायव्हरला सुपारी दिली. हा ठरवून केलेला कोल्ड ब्लडेड ‘मर्डर’ होता, ज्याला अपघाताचा रंग देण्याचा प्रयत्न झाला.
आरोपी प्रकाश गावंडे हा आपल्या पत्नीचा छळ करत होता. याआधीही त्याच्यावर ४९८ कलमाअंतर्गतचा गुन्हा दाखल झाला होता. तडजोड होऊन वृषाली पुन्हा नांदायला आली होती. आरोपी प्रकाश गावडे याने पत्नी वृषालीला याआधी 3 वेळेस जेवणातून विषारी औषध देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दल तक्रार मृतक पत्नी वृषालीच्या भावाने पोलिसांत दिली होती.
शेवटी नराधम पतीने आपल्या मित्राच्या मदत घेतली. एका मित्राला 1 लाखाची सुपारी दिली. वृषाली स्कुटीवरून जात होत्या तेव्हा भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या टेम्पोनं धडक दिली, या अपघातात वृषालीचा मृत्यू झाला. पण हा अपघात नसून हत्या होती, हे पोलीस तपासात समोर आलं. पोलिसांनी आता या तिन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या असून हत्येसाठी वापरलेलं वाहन आणि सुपारीचे पैसेही जप्त केले आहेत.
पती-पत्नीच्या प्रेमळ नात्याला कलंक लावणारी आणि माणुसकीला लाजवणारी ही घटना आहे. ज्या घरात प्रेम नांदायला हवं होतं, तिथे क्रौर्याने जागा घेतली. आज आरोपी गजाआड आहेत, पण एका निष्पाप शिक्षिकेचा बळी गेलाय. बुलढाणा जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने पुन्हा एकदा नात्यांमधील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.



