महाराष्ट्र
पुण्यातील ग्रामीण भागात जमावबंदीचे आदेश लागू
पुणे : त्रिपुरा राज्यात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचे महाराष्ट्रात देखील पडसाद उमटले आहेत. त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ रझा अकादमीने 12 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या बंदला नांदेड, मालेगाव, अमरावती, पुसद आणि कारंजा या ठिकाणी हिंसक वळण लागले. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्याचे आदेश आज पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
राज्यात ठिकठिकाणी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कलम 144 म्हणजेच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी रविवार, दि. 14 नोव्हेंबर ते शनिवार, दि. 20 नोव्हेंबर या कालावधीत जमावबंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार आज म्हणजेच रविवारी रात्री 12 वाजल्यापासून ते शनिवार, 20 नोव्हेंबर रात्री 12 या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमावबंदी करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात तणाव निर्माण होईल असे पोस्टर किंवा मोबाईलवरुन व सोशल मीडियावरून मजकूर प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे. तशा आशयाचं पत्रक देखील जिल्हाधिकाऱ्यांनी काढलं आहे
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीने व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ, पोस्ट टाकणे किंवा शेअर करणे अशी कृत्ये केल्यास त्याला ग्रुप अॅडमिन सर्वस्वी जबाबदार राहील. समाज माध्यमांवर जाणीवपूर्वक चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच पाच व पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मजकुरांचे फ्लेक्स बोर्ड लावणे किंवा त्या प्रकारच्या घोषणा देण्यास पुणे ग्रामीण भागात मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील या आदेशात म्हंटले आहे.






