या तीन गावात होतो भुजरीया उत्सव उत्साहात साजरा.. , जाणून घ्या काय
रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज साजरा होणारा भुजरिया सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील परदेशी धनगर जमातीत भुजारिया उत्सवाचे विशेष महत्त्व मानले जाते. त्यासाठी आठवडाभर आधी घरोघरी भुजऱ्या पेरल्या जातात. या दिवशी भुजारीया नदी, विहिरी, तलाव इत्यादींमधून बाहेर काढून प्रथम देवाला अर्पण केल्या जातात. यानंतर लोक एकमेकांशी भुजऱ्यांची देवाणघेवाण करतात आणि आपल्या चुका विसरून एकमेकांना मिठी मारतात.
धुळे जिल्ह्यातील कुसुंबा व जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील आखतवाडे, बदरखे आणि मोहळाई या गावात परदेशी धनगर घरोघरी भुजऱ्यांचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. सासू सुनेला, आई आपल्या मुलीला या उत्सवाबद्दल सतत सांगत असल्यामुळे पिढ्यानपिढ्या भुजेरीय उत्सवाची परंपरा सुरु आहे.
श्रावण महिन्याच्या अष्टमीला गहू किंवा जवाची धान्ये बांबूच्या छोट्या टोपल्यांमध्ये आपल्या शेताच्या मातीचा थर पसरवून पेरतात. त्यानंतर त्यांना दररोज पाणी दिले जाते. त्यांची काळजी घेतली जाते ते धान कसे उगवते यावर लक्ष ठेवले जाते. श्रावण महिन्यात या भुजऱ्यांना झुलवण्याचीही प्रथा आहे. हे धान्य साधारण एका आठवड्यात उगवते, याला भुजरिया म्हणतात.
या भुजऱ्यांची पूजा केली जाते आणि यावर्षी पाऊस चांगला व्हावा म्हणजे चांगले पीक यावे, अशी इच्छा व्यक्त केली जाते. जुने जाणते लोकं भुजऱ्यांची अख्यायिका वेगवेगळ्या प्रमाणात सांगितात. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत या भुजऱ्या चार ते सहा इंच होतात. रक्षाबंधनाच्या दुस-या दिवशी एकमेकांना देवून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले जातात. वडीलधाऱ्यांच्या मते हा भुजारिया नवीन पिकाचे प्रतीक आहे. रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी महिला या टोपल्या डोक्यावर घेऊन जलस्त्रोतांमध्ये विसर्जन करतात.




