परभणीतील घटनेचा पडसाद, पाचोऱ्यात समता सैनिक दलातर्फे धिक्कार मोर्चा..
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या संशायास्पद मृत्युची न्यायालयीन चौकशी करून अत्याचार थांबविण्यात यावा, या मागणीसाठी समता सैनिक दलातर्फे धिक्कार मोर्चा काढुन प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
पाचोरा – झूम मराठी ऑनलाईन.
परभणी येथे संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या देशद्रोही इसमावर कार्यवाही करावी तसेच या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या बौद्ध समाजावर पोलिसी अत्याचार व घटनेत शहीद झालेले सोमनाथ सुर्यवंशी यांच्या संशायास्पद मृत्युची न्यायालयीन चौकशी करून अत्याचार थांबविण्यात यावा, या मागणीसाठी समता सैनिक दलातर्फे धिक्कार मोर्चा काढुन प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
१० डिसेंबर रोजी परभणी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ असलेली संविधानाची प्रतिकृती फोडून तिची विटंबना करण्यात आली. या घटनेमुळे लोकशाहीवादी, संविधान प्रेमी तसेच आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे कृत्य करणाऱ्या देशद्रोही समाज कंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. याच पार्श्वभूमीवर परभणी येथे आंबेडकरी समाजाने सामुहिकरित्या निषेध नोंदविला आणि आंदोलन केले असता शांतता भंग झाल्याचा ठपका ठेवून बौद्ध समाजाच्या लोकांवर पोलिसांनी कठोर कारवाई चालू केली आहे.
बौद्धांना घरात घुसून पोलीस मारहाण व निरपराध लोकांना अटक केली जात आहे. वेगवेगळी गंभीर कलम लावून सुशिक्षित तरुणांना आरोपी हुकूमशाही पद्धतीने केली जात आहे. या घटनेत शहीद झालेले सोमनाथ सुर्यवंशी यांचा संशायास्पद मृत्यु झाला त्यांच्या मृत्युची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. तसेच या सर्व घटनेची सखोल न्यायालयीन चौकशी करून बौद्ध समाजावर चालविला जाणारा अन्याय बंद करावा अन्यथा या अत्याचार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. शासनाने याची गांभीयनि नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर समता सैनिक दलाचे किशोर डोंगरे, ज्ञानेश्वर सावळे, अरूण खरे, विक्की ब्राम्हणे व दशरथ तांबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




