चाळीसगाव – प्रेमविवाहचा शेवट झाला कटू; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
Published By Dileep pardeshi @ Zoom Marathi news
मेहुणबारे, (ता. चाळीसगाव) : माहेरहून घर बांधण्यासाठी आई- वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये, तसेच पतीच्या नावावर दोन एकर जमीन करण्यास सांग, अशा मागण्या करीत तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचा सासू, जेठ व जेठाणी यांनी छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ब्राह्मणशेवगे (ता. चाळीसगाव) येथे घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात सासू, जेठ व जेठाणी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्राह्मणशेवगे (ता.चाळीसगाव) येथील सविता हिने घराशेजारी राहणाऱ्या रवींद्र चव्हाण याच्याशी तीन वर्षांपूर्वी आळंदी येथे विवाह केला होता. त्यानंतर १५ दिवसांनी हे दांपत्य मेहुणबारे पोलिस ठाण्यात हजर झाले होते. त्या वेळी दोघांनी पोलिसांना आम्ही स्वखुशीने लग्न केल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी या दोघांचे रितसर लग्न लावून दिले. लग्नानंतर दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. लग्नानंतर एक दोन महिने सविता हीस तिच्या सासरच्यांनी चांगले वागविले. नंतर मात्र सवितास मुलगा झाल्यानंतरही सासूकडून हुंडा कमी दिला, असे सांगत काहीना काही कारणांवरून टोमणे मारत व मानसिक छळ करत, तसेच दोघांना सासूने वेगळे काढून दिले.
शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून सविता हिने रविवारी (ता. ३१) सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र या आत्महत्येला मृत सविता हिची सासू, जेठ व जेठाणी हे जबाबदार असल्याची फिर्यादी आशाबाई मोरे यांनी दिल्यावरून सासू तुळसाबाई चव्हाण, जेठ समाधान मच्छिंद्र चव्हाण व जेठाणी दिया समाधान चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत.



