ह्रदयद्रावक…गणपती विसर्जन मिरवणुकीपूर्वीच धुळ्यातील चितोड येथे ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू..
गणेश विसर्जनाच्या मिरवणूक निघण्यापूर्वीच गावात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर टालीच्या भीषण अपघाताच्या घटनेने गावात स्मशान शांतता पसरली आहे
गणरायाला उत्साहात निरोप देण्यासाठी मिरवणुका सुरू असतानाच धुळे शहरालगत असणाऱ्या चितोड गावात ट्रॅक्टर गर्दीत शिरल्याने ३ बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि. १७) घडली. या अपघातात ६ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धुळे शहरालगत असणाऱ्या चितोड गावात एकलव्य मित्र मंडळाच्या माध्यमातून गणरायाला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये गणरायाची मूर्ती ठेवून ही मिरवणूक सुरू असतानाच चालकाचा अचानक ट्रॅक्टर वरून ताबा सुटला. त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या गर्दीत हा ट्रॅक्टर शिरला. त्यामुळे चाकाखाली आल्यामुळे परी बागुल (वय १३), शेरा सोनवणे (वय ६), लड्डू पावरा (वय ३) या बालकांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला, तर गायत्री पवार (वय २५), विद्या जाधव (वय २७), अजय सोमवंशी, उज्ज्वला मालचे (वय २३), ललिता मोरे, रिया सोनवणे (वय १७) हे जखमी झाले. हा अपघात झाल्यामुळे मिरवणुकीत गोंधळ सुरू झाला. मात्र, जखमींना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. या घटनेमुळे चितोड गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.



