बिबटयाच्या हल्ल्यात बालक ठार!
चाळीसगाव तालुक्यात मित्रांसोबत संध्याकाळी धावण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय बालकावर दबा धरुन बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना गणेशपूर (ता. चाळीसगाव) शिवारातील पाटणा रस्त्यावर शनिवारी (ता. १४) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी रिंकेश गणेश मोरे (वय १३) हा आपल्या तीन मित्रांसोबत पाटणा रस्त्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास रनिंग करण्यासाठी निघाला होता.सर्वांच्या पुढे धावत असलेल्या रिंकेशला काही अंतरावर बिबट्या आढळला. बिबट्याला पाहताच रिंकेशने मागे धावत येणाऱ्या मित्रांना आवाज देऊन तो स्वतः जवळच्या एका झाडावर चढला. त्याच्या मागून धावणाऱ्या मित्रांनी हे पाहताच, तिघे मागच्या मागे गावाकडे पळाले. गावात येताच त्यांनी बिबट्याला पाहिल्याचे सांगून रिंकेश झाडावर चढला असल्याचे सांगितले. हे ऐकताच ग्रामस्थांनी पाटणा रस्त्याकडे धाव घेतली. गावापासून एक किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी रिंकेश झाडावर चढला होता, त्या ठिकाणी येऊन पाहिले असता, रिंकेश त्यांना आढळून आला नाही.
त्यामुळे सुमारे अर्धा तास ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला असता, एका ठिकाणी रक्त सांडलेले मिळून आले. त्यामुळे ग्रामस्थांचा संशय वाढल्याने त्यांनी थोडे पुढे जाऊन जवळच्या नदीकाठावरील प्रकाश पाटील यांच्या शेतात पाहणी केली असता, रिंकेशचा मृतदेह आढळून आला. रिंकेशच्या अंगावर कपडे नव्हते. त्याच्या मानेजवळ दातांचे निशाण होते तर त्याचा मागचा भाग खाल्लेला आढळून घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना कळताच त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच संपूर्ण गाव नदीकाठी गोळा झाले. या घटनेचा रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरु होते. या घटनेची माहिती समजताच तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील तत्काळ गावात भेट देऊन उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी पिंजरा लावण्यातयेत असल्याचे पोलिस पाटलांनी सांगितले.रात्री अपरात्री कोणीही घराबाहेर एकटे जाऊ नये. बिबट्याचा वावर असल्याने मुलांना रनिंग करण्यासाठी गावाबाहेर जाऊ देऊ नये. वृद्धांना एकटे शोधू नये.”- शीतल नगराळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव



