भोकर, पिंप्राळा, असोदा, नशिराबाद, जळगाव मंडळात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान!
पंचनामे करून भरपाई देण्याची माजी कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकरांची मागणी..
- दिलीप जय परदेशी
जळगाव तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीने केळीसह कपाशी, सोयाबीन, ज्वारी तसेच इतरही बऱ्याच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी व महसूल विभागाने तात्काळ पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी कृषी व परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी त्यामुळे केली आहे.
जळगाव तालुक्यातील भोकर, पिंप्राळा, असोदा, नशिराबाद तसेच जळगाव महसूल मंडळात तब्बल ८१ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी नशिराबाद मंडळात सर्वाधिक ११७.८ मिलीमीटर तसेच पिंप्राळा मंडळात ८२.० मिलीमीटर, भोकर मंडळात ८२.५ मिलीमीटर, असोदा मंडळात ९९.० मिलीमीटर आणि जळगाव मंडळात ७८.५ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
अवघ्या दहा तासात सरासरी सुमारे ८१ मिलीमीटर पाऊस पडल्याने अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आता साचले आहे. पाण्याचा निचरा करण्याची कोणतीही सोय राहिलेली नसल्याने कापसासह सोयाबीन, ज्वारी तसेच केळी यासारख्या पिकांची अवस्था त्यामुळे नाजूक झाली आहे. अनेक ठिकाणी शिवारातून वाहणाऱ्या नाल्यांच्या पुरात सुपिक शेती खरडली गेली असून, मेहनतीने जगविलेल्या पिकांवर गाळ फिरला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने संबंधित शेतकरी हताश झाले आहेत. दरम्यान, अतिवृष्टीने नाजूक झालेली पीकस्थिती सुधारण्याची शक्यता आता कमीच आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने आपल्या यंत्रणेमार्फत विनाविलंब तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत. तसेच नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई देण्याची व्यवस्था करावी, असेही माजी मंत्री कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी म्हटले आहे.



