आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत सेवाभावी कुस्तीपटू काकासाहेब पाटील यांचा निरोप समारंभ भावुक वातावरणात संपन्न
पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे गावाच्या सामाजिक, क्रीडा, आणि विकास कामांमध्ये नेहमी अग्रेसर राहून आपल्या सेवाभावी आणि कर्तृत्वशील कार्यशैलीने समाजमनात आदराचे स्थान निर्माण करणारे काकासाहेब कृष्णराव पाटील यांचा निरोप समारंभ महादेवाचे बांबरुड येथे रविवार, १३ जुलै २०२५ रोजी अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. बजाज ऑटो कंपनी, छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल ३५ वर्षे क्वालिटी कंट्रोलर इन्स्पेक्टर पदावर निष्ठेने सेवा बजावणाऱ्या या कुस्तीवीर सेवकाचा गौरव करण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आले.
कार्यक्रमाचे आयोजन पद्माई सिमेंट प्रॉडक्ट्स व महादेवाचे बांबरुड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या गौरव समारंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यामध्ये सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब किशोर पाटील (आमदार, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ) होते. तर माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ, आरटीओ इन्स्पेक्टर दादासाहेब हेमंत शिवाजी पाटील (जळगाव), भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेशअण्णा परदेशी, भडगाव शेतकरी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, आणि माजी प्राचार्य सुनील आबा पाटील यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमास लाभली. या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थ, हितचिंतक, नातेवाईक, मित्रमंडळी, महिला मंडळ, तरुण वर्ग अशा विविध स्तरातील शेकडो लोकांनी उपस्थित राहून काकासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप महाजन यांनी केले. काकासाहेबांचा विस्तृत परिचय सुधाकर सोनवणे यांनी सुस्पष्ट शब्दांत मांडला. त्यांनी केवळ नोकरीत निष्ठा ठेवली नाही तर आपल्या मूळगावी बांबरुड येथे सतत शासनदरबारी पाठपुरावा करत विकासकामे, योजना, क्रीडांगण सुधारणा व युवा प्रोत्साहनासाठी मोठे योगदान दिले, हे विशेषत्वाने उपस्थितांना पटवून दिले.कार्यक्रमात काकासाहेब पाटील आणि त्यांच्या सौ. सुषमाताई पाटील यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण समारंभात एक आगळीच जिव्हाळ्याची आणि आदरभावाची भावना अनुभवायला मिळाली. त्यानंतर बबनराव पाटील व संगीता पाटील यांचा देखील ‘शिलेदार ग्रामसेवक’ पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराने गावातील ग्रामपंचायतीच्या गुणवत्तापूर्ण सेवकांच्या कार्याची दखल घेतल्याचे निदर्शनास आले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांनी काकासाहेबांच्या प्रामाणिक सेवेला दाद देत त्यांच्या साध्या पण प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले. “अशा व्यक्ती गावाचा गौरव असतात. सेवेत असतानाही त्यांनी गावासाठी अनेक योजनांची जोड मिळवून दिली आणि सेवा निवृत्तीनंतरही ते समाजाच्या केंद्रस्थानी राहतील,” असे त्यांनी सांगितले. माजी आमदार भाऊसाहेब वाघ यांनी त्यांच्या कुस्तीप्रेमी कार्यकर्तृत्वाचा विशेष उल्लेख करत गावातील युवा पिढीने त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी, असे मत मांडले. इन्स्पेक्टर दादासाहेब पाटील यांनी एक उत्कृष्ट कर्मचारी आणि सामाजिक भान असलेली व्यक्ती म्हणून त्यांच्याशी असलेल्या सहवासाचे अनुभव शेअर केले.
गणेशअण्णा परदेशी, भैय्यासाहेब पाटील आणि सुनील आबा पाटील यांनी देखील त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून दिले. या सोहळ्याचा मुख्य भाग ठरला तो काकासाहेब पाटील यांचे भावनिक उत्तर भाषण. त्यांनी आपल्या सेवाकाळात आलेल्या अनुभवांचे निवेदन करत ग्रामस्थ, कंपनीतील सहकारी, आणि कुटुंबियांचे आभार मानले. “नोकरी ही केवळ उपजीविकेचे साधन नव्हे तर समाजहिताचा पूल ठरतो, हे मी नेहमी लक्षात ठेवले. गावासाठी काही करावे ही भावना मनात होती आणि ती पूर्ण करण्यासाठी शासनदरबारी सातत्याने आवाज उठवला,” असे त्यांनी नम्रतेने सांगितले. भाषणादरम्यान उपस्थितांच्या डोळ्यांतून आसवे ओघळताना दिसली. समारोपाच्या भागात स्नेहींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये बांबरुडच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा ग्रामस्थांच्यावतीने गौरव करण्यात आला. यानंतर सर्व मान्यवर, ग्रामस्थ व उपस्थित पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाची मनोहर व्यवस्था करण्यात आली होती. भोजन सोहळ्याने कार्यक्रमाचा उत्कर्ष गाठला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मा महादू पाटील यांच्यासह बांबरुड ग्रामस्थांनी संयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचे नियोजन, सुसंवाद, आणि सामूहिक सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला. हा केवळ सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नव्हता, तर एका संपूर्ण पिढीला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सार्वजनिक गौरव होता.आजच्या धावपळीच्या युगात स्वतःची सेवा बजावत असतानाच आपल्या गावासाठी सातत्याने झटणारी माणसे विरळाच. काकासाहेब पाटील यांचा प्रवास हेच अधोरेखित करतो की – एकच आयुष्य जगायचे असेल तर ते समाजासाठी झिजवावे. बांबरुड ग्रामस्थांनी याच विचाराने त्यांचा गौरव करत, त्यांच्या योगदानाला सामूहिक मान्यता दिली. कार्यक्रमानंतर संपूर्ण गावभर या समारंभाबद्दल कौतुकाचे सूर आणि अभिमानाचे भाव उमटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सी एन चौधरी तर आभार सुधाकर सोनवणे यांनी मानले.



