धुळ्यात भाजपाच्या नियोजन शून्य कारभाराच्या निषेधार्थ, राष्ट्रवादीचे पक्षाचा हंडा मोर्चा !
पाणी प्रश्न पेटला, धुळे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हंडा मोर्चा
झूम मराठी
धुळे (झूम मराठी) lशहरातील जलसाठ्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असताना देखील मनपा अधिकारी व सत्ताधारी भाजपाच्या नियोजन शून्य कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने नियमित पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी शहरातील झांसी राणी पुतळा ते महानगरपालिकेपर्यंत घागर मोर्चा काढून मनपा प्रवेशद्वारासमोर घागर फोडो आंदोलन केले. महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपा व मनपा अधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने देखील करण्यात आली.
शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा मनपाच्या अधिकार्यांनी सुरळीत न केल्यास अधिकाऱ्यांना दालनात बसून न देण्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रंजीत भोसले यांनी मनपाला दिला आहे. निवडणुकीच्या काळात धुळेकरांना रोज पाणी देणार असे म्हणणारे जामनेरचे गिरीश महाजन गेले कुठे? असा संतप्त सवाल देखील राष्ट्रवादीने भाजपाला विचारला आहे.
राष्ट्रवादीने मोर्चा काढत अतिरिक्त आयुक्तांना पाण्यासाठी घेराव घालून चांगला जाब विचारला आहे. शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस चांगलाच पेटत चालला आहे. नागरिकांना १० ते १२ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा, त्यामुळे त्यांचे पाण्यावाचून होणारे हाल लक्षात घेता शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी भाजपच्या विरोधात आंदोलने केली आहेत. मनपाला पाण्याचे नियोजन करण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे. धुळेकरांना नियमित पाणीपुरवठा व्हावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीने मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजपाला दिला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


