पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील सुनील लोणकर (वय २४, रा. फुरसुंगी) याने राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्नील याच्या आत्महत्येने खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आले. स्वप्नीलच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. स्वप्नीलच्या कुटुबीयांनी माध्यमांसमोर आक्रोश व्यक्त केला असून सरकारला जबाबदार धरलं आहे.
स्वप्नीलच्या आई-वडिलांनी आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलं. स्वप्नीलचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक कष्ट सोसले होते. स्वप्नील त्यांच्या आई-वडिलांच्या कष्ट्वाचे चिज करत होता. तो एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. स्वप्नीलविषयी बोलताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. ‘आज एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती तर मंत्र्याला जाग आली असती का नाही? तसंच दुसऱ्यांच्या आई-वडिलांचाही विचार करा. त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल. स्वप्नील हुशार होता, त्यामुळे आम्ही त्याला शिकवलं. तो परीक्षा पासही झाला. पण, मुलाखत होत नसल्याने तो आत्महत्येस प्रवृत्त झाला. माझा तळतळाट आहे की एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याशिवाय सरकारला कळणार नाही की मुलगा जाण्याचं दु:ख काय असतं, असं म्हणत स्वप्नीलच्या आईने आक्रोश व्यक्त केला.
राजकारण्यांमध्ये नुसते भांडणे सुरु आहेत. त्यांना जगात काय सुरु आहे, काहीही माहिती नसतं. त्यांना कुणाशी काहीही देणंघेणं नाही. कोण किती झुरतंय, किती त्रासात आहे. त्यांना फक्त राजकारणाचं पडलंय. मला माहितेय माझं पोरगं किती झुरलंय ते. आई मुलाखत झाली नाही असं तो मला म्हणायचा. परीक्षा पास झालोय, पण मुलाखत अजून झाली नाही. दोन वर्ष तो खूप झुरला. यांची मुलं सुरक्षित आहेत, म्हणून यांना काही देणं-घेणं नाही. गरीबांची काय कितीही गेले तरी त्यांना फरक पडत नाही. दुसऱ्यांच्या वेदना यांना कळणार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वप्नीलच्या आईने दिली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा