शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यात सरकार अपयशी : गिरीश महाजन
जामनेर (जळगाव) : शेकडो शेतकऱ्यांकडे (Farmer) आजही हजारो क्विंटल मका व ज्वारी पडलेली आहे. परंतु शासनाने मात्र तालुक्याला १ हजार ५०० क्विंटल मका तर १ हजार ६५० क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देऊन शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्टा केली. मुळात राज्य सरकार हे शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला.
जामनेर बाजार समितीच्या आवारात शेतकरी सहकारी संघाच्यावतीने आज (ता.१४) शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आनंदा पाटील (रा. चिंचखेडा) या शेतकऱ्याचा गिरीष महाजन यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी तहसिलदार अरुण शेवाळे, शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर, उपसभापती बाबुराव गवळी, संचालक डॉ. सुरेश पाटील, रमेश नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, सचिव प्रसाद पाटील आदी होते.
आमदार महाजन म्हणाले, की शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र फक्त देखाव्यासाठी सुरू केले आहे. या केंद्रात मका १ हजार ८५० तर ज्वारी २ हजार ६२० प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातील महाविकास आघाडी शासनाने कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. राज्य सरकार सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांबाबत उदासीन असुन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात पार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला.


